धनंजय मुंडे राजीनामा कधी देणार? अजित पवारांनी केले मोठे विधान, म्हणाले….

मुंबई : बीडच्या संतोष देशमुख हत्याप्रकरणी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांची मंत्रिपदावरुन हाकलपट्टी करण्यात यावी या मागणीने जोर धरला आहे. यामुळे आता ते राजीनामा देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनीही अजित पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही या प्रकरणी भेटले होते. त्यावेळी मुंडे राजीनामा देतील अशी शक्यता वर्तवली जात होती. तशा राजकीय वर्तूळात चर्चाही होत होत्या. त्याला आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुर्णविराम दिले आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत आहे. संतोष देशमुख हत्ये प्रकरणी एसआयटी नेमण्यात आली आहे. सीआयडी मार्फत ही चौकशी सुरू आहे. तर न्यायालयीन चौकशी केली जात आहे. त्यामुळे तीन-तीन यंत्रणा यात चौकशी करत आहेत, असं अजित पवारांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणी जर कोणी दोषी असेल. त्याच्या वरील गुन्हा सिद्ध झाला तर त्याला सोडलं जाणार नाही अशी भूमीका मांडली आहे. आपण ही या प्रकरणी फडणवीसांची भेट घेतली होती. या प्रकरणात पक्ष वैगरे पाहू नका. यात जर मोठ्या पदावर काम करणारी व्यक्ती जरी अडकली असेल तरी त्याच्यावर कारवाई करण्यात गय करू नका असं सांगितलं आहे. त्याला मुख्यमंत्र्यांनीही दुजोरा दिला आहे. असेही ते म्हणाले आहे.
आरोप करताना कोणावर अन्याय होवू नये याची ही आरोप करणाऱ्यांनी खबरदारी घेतली पाहीजे असंही ते म्हणाले. जो दोषी असेल त्याला पाठीशी घातलं जाणार नाही. त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले.
सुरेश धस आरोप करत आहे. पण पुरावे नसतील तर आरोप करणं कितपत योग्य आहे असा प्रश्न त्यांनी करत धनंजय मुंडे यांची एक प्रकार पाठराखण त्यांनी केली. यात आम्हाला राजकारण येवू द्यायचे नाही असं ही त्यांनी स्पष्ट केलं. पण धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार की नाही या मुळ प्रश्नाला अजित पवारांनी बगल दिली. त्यामुळे सध्या तरी धनंजय मुंडे यांना अभय दिला आहे याचेच संकेत अजित पवारांनी यातून दिले आहेत.