Waqf Board : वक्फ सुधारणा विधेयक अखेर लोकसभेत सादर, विरोधकांनी घातला गोंधळ…

Waqf Board : गेल्या काही दिवसांपासून देशात वक्फ बोर्डाची खूप चर्चा सुरू आहे. केंद्र सरकार या वक्फ बोर्डाच्या कायद्यात सुधारणा करणार असल्याचे बोलले जात होते. त्यानुसार, आज (ता.९) संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी वक्फ कायदा १९९५ मध्ये सुधारणा करण्यासाठी वक्फ (सुधारणा) विधेयक २०२४ लोकसभेत सादर केले.

हे विधेयक सादर करताच विरोधकांनी एकच गोंधळ घातला. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक आणि समाजवादी पार्टीच्या खासदारांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. तर संसदेच्या बाहेरही याच मुद्द्यांवरून विरोधकांनी शंका उपस्थित केली.
या विधेयकाला नितीश कुमारांच्या जेडीयूने पाठिंबा दर्शवला आहे, पण काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि ‘एमआयएम’सह सर्व विरोधी पक्षांना या विधेयकाला संविधानविरोधी म्हणत विरोध केला आहे.

जेडीयू नेते आणि केंद्रीय मंत्री लालन सिंह यांनी संसदेत वक्फ विधेयकाचे समर्थन केले आहे. लालन सिंह यांनी विरोधकांवर टीका करत हे विधेयक मुस्लिमविरोधी नसल्याचे म्हटले आहे. विरोधक मंदिराबद्दल बोलत आहेत, इथे मंदिराची चर्चा कुठून आली? मुळात कोणतीही संस्था निरंकुश झाली की, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि पारदर्शकतेसाठी सरकार कायदे करत असते.

हा सरकारचा हक्क आहे. हे विधेयक पारदर्शकतेसाठी आहे. ज्यांनी शिखांची हत्या केली, ते आज अल्पसंख्याकांबद्दल बोलत आहेत. या विधेयकात मशिदीबाबत कोणतीही छेडछाड केलेली नाही. वक्फ बोर्डात पारदर्शकता आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
काँग्रेसचा विधेयकाला विरोध : हे विधेयक म्हणजे संविधानावर मूलभूत हल्ला आहे. या विधेयकाद्वारे गैरमुस्लिमांनाही वक्फ गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य असावेत, अशी तरतूद करत आहेत. हा थेट धर्मस्वातंत्र्यावर हल्ला आहे. Waqf Board
पुढे तुम्ही या विधेयकाच्या माध्यमातून ख्रिश्चन, जैन, विविध धर्मात ढवळाढवळ कराल. भारतातील लोक आता अशा प्रकारचे फूट पाडणारे राजकारण सहन करणार नाहीत. आम्ही देखील हिंदू आहोत, पण इतर धर्मीयांच्या श्रद्धेचा आदर करतो. हे विधेयक महाराष्ट्र आणि हरियाणा निवडणुकीसाठी आणले जात आहे. लोकसभेत जनतेने तुम्हाला धडा शिकवला, हे तुम्हाला अजून समजलेले नाही, अशी टीका काँग्रेस खासदार केसी वेणूगोपाल यांनी केली.