येत्या दोन वर्षांत तुळजापूरचा कायापालट करणार, विकास आराखड्याला मुख्यमंत्र्यांकडून मान्यता…

तुळजापूर : आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिर संस्थानच्या प्रशासकीय इमारतीतील सभागृहात तुळजापूर विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी तुळजापूर विकास आराखड्याला शासनाने तत्त्वत: मान्यता दिली.
यातील महत्त्वाच्या कामांसाठी तातडीने निधी वितरित करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आराखड्यातील कामांमुळे येत्या दोन वर्षांत तुळजापूरचा कायापालट झालेला दिसेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
आराखड्यातील महत्त्वाच्या बाबींमध्ये तुळजापूरला जागतिक दर्जाचे धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. भाविकांना सुलभ व जलद दर्शन मिळावे, यासाठी स्मार्ट क्यू सिस्टीम, ऑनलाईन दर्शन व्यवस्था, वाहतूक सुविधा, वाहन पार्किंगपासून मंदिरापर्यंतची सेवा, शौचालयांची संख्या वाढवणे, कचरा व्यवस्थापन, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन अशा विविध उपाययोजना आराखड्यात समाविष्ट आहेत.
यावेळी मंदिर संस्थानचे विश्वस्त आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार अभिमन्यू पवार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी व मंदिर संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.