माणूस मारायला लागलाय आणि तुम्ही वेळकाढूपणा करताय? कॅन्सर झालेल्या रुग्णाचा मेडीक्लेम नाकारल्यानंतर हायकोर्टाने सुनावलं…

नवी दिल्ली : दिल्लीतील घटना असून मात्र संपूर्ण देशात सध्या विमा कंपन्या आणि ग्राहक यांच्यात होणारा बेबनाव आणि क्लेम देण्यासाठी होणारी टाळाटाळ यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण दिल्ली हायकोर्टाने नुकतेच एका विमा कंपनीला क्लेम रिजेक्ट केला म्हणून खडसावले आहे.
घटना आहे बिहार मधल्या संतोष पांडे या रुग्णाची. संतोष पांडे यांना तोंडाचा कॅन्सर झाला. एकाच महिन्यात त्यांचे वजन 36 किलोने घटले. तपासण्या केल्यानंतर त्यांना कर्करोग झाल्याचे निदान आले. त्यावरून त्यांना दवाखान्याने ३५ वेळा किमोथेरपी आणि ट्रिकीयोस्टॉमी करावी लागेल असे सांगितले.
त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. आतापर्यंत २० लाख रुपयांचा खर्च झाला आहे . मात्र त्यांनी या उपचारासाठी उतरवलेला विमा त्या विमा कंपनीने ते तंबाखू खातात म्हणून फेटाळला. आपले वडील तंबाखू खात नाहीत किंवा गुटखा ही खात नाहीत हे माहिती असल्याने व कंपनी आता फोनही उचलत नसल्याने त्यांच्या मुलीने उच्च न्यायालयाच्या दरवाजा ठोठावला.
दरम्यान, अनेक विमा कंपन्या आरोग्याचा विमा नाकारताना वेगवेगळी कारणे देतात. तोंडाचा कर्करोग झालेल्या या रुग्णाने जेव्हा विमा कंपनीला क्लेम मागितला, तेव्हा तुम्ही गुटखा खाता या मुद्द्यावरून पहिल्याच टप्प्यात कंपनीने क्लेम रिजेक्ट केला. त्यानंतर रुग्णाचा हा प्रकार दिल्लीच्या उच्च न्यायालयात पोहोचला. तेव्हा विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यावर उत्तर देण्यासाठी वेळ मागितला.
तसेच रुग्णाच्या वकिलांनी अत्यंत गंभीर बाब असल्याचे कोर्टाच्या नजरेस आणून दिले वडिलांचा खर्च विमा कंपनीच्या पैशाशिवाय होऊ शकत नाही आमची तेवढी परिस्थिती नाही आणि जर वेळेत उपचार झाले नाहीत तर त्यांचं आयुष्य कमी होऊ शकतं आणि कर्करोग हे वाढू शकतो हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी, एक व्यक्ती मरत आहे आणि तुम्हाला फक्त उत्तर देण्यासाठी वेळ मागता? पुढच्या तारखेला येताना तुम्ही तुमच्या कंपनीच्या एमडी ला घेऊन या! असे तडाखेबंद सुनावत न्यायालयाने या प्रकरणाची 14 मे ही सुनावणीची पुढील तारीख दिली.