विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात! 12 वीच्या उत्तरपत्रिका जळाल्या, शिक्षिकेच्या निष्काळजीपणामुळे धक्कादायक प्रकार आला समोर..

मुंबई : बोर्डाची परिक्षा म्हणजे एक महत्वाची परीक्षा म्हणून अगदी काळजीपूर्वक आणि व्यवस्थित पेपर तपासले जातात. तसेच विद्यार्थी देखील आपला आयुष्याचा महत्वाचा टप्पा म्हणून अभ्यास करत असतात. किती मार्क मिळतील, आवडीची फिल्ड पुढे निवडता येईल की नाही, असे एक ना अनेक प्रश्न मुलांच्या डोक्यात असतात.
असे असतानाच आता मुंबईतीव विरारमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विरार मध्ये 12 वी कॉमर्स च्या तपासणीसाठी आलेल्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरी जळल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. त्यामुळे कित्येक विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागलं आहे. यामुळे संताप व्यक्त होत आहे. आता करायचं काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
उत्तरपत्रिका जळाल्याचा व्हिडीओ सध्या वसई विरार मधील सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, शिक्षिकेच्या निष्काळजी पणा विरोधात विध्यार्थी आणि पालक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. विरार पश्चिम गंगुबाई अपार्टमेंट बोलींज नानभाट रोड, आगाशी परिसरात राहणाऱ्या शिक्षिकेच्या घरी ही घटना घडली आहे.
हे पेपर रीचेकिंग साठी घरी आणले होते. त्यांनी सोफ्यावर पेपर ठेवले होते. मात्र त्यानंतर शिक्षिकेच्या घरातील लोक बाहेर गेले. त्यांचं घर बंद असताना अचानक शॉर्ट सर्किट झालं आणि आग लागली. त्यामध्ये बारावीचे पेपरही जळून खाक झाले. यामुळे असे पेपर घरी आणता येतात का ?, ही शिक्षिका कोणत्या शाळेची आहे? यात कुणाचा निष्काळजी पणा आहे, पेपर जाळले की जळाले याचा तपास पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी एक शिक्षक चक्क बसमध्ये बारावीचे पेपर तपासताना दिसले. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. शिक्षक चक्क चालत्या बसमध्ये बारावीच्या उत्तरपत्रिका तपासताना दिसत होते. चालत्या बसमध्ये हे शिक्षक अगदी बिनधास्त या उत्तरपत्रिका तपासताना दिसत होते.
व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी शिक्षकांच्या या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एकंदरच विद्यार्थ्यांचे पेपर तपासताना शिक्षकांचा हलगर्जीपणा होत असून या घटनांमुळे संताप व्यक्त होत आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.