आता १ रुपयांत मिळणार मेंढ्यांना विमा?, राज्य सरकारची मोठी घोषणा, मेंढपाळांना मोठा दिलासा…

पुणे : मोठ्या प्रमाणावर राज्यात मेंढीपालन केले जाते. अनेकदा या मेंढ्या वेळेत उपचार न मिळाल्याने किंवा इतर कारणांमुळे मृत पावतात. त्यामुळे मेंढपाळांना आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागते.

परंतु आता मेंढपाळांची या समस्येतून सुटका होणार आहे. याच पार्श्वभुमीवर सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. पीक विम्यानंतर मेंढ्याचा आता अवघ्या १ रुपयांत विमा देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती अल्पसंख्याक विकास, औकाफ व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.
तसेच धनगर समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचेही सत्तार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मेंढपाळांना काहीसा दिलासा मिळाला आहे. ते सिल्लोड येथे राज्यव्यापी धनगर समाज निर्धार मेळाव्यात बोलत होते.

सत्तार पुढे म्हणाले की, मेंढपाळांना सतत अडचणींचा सामना करावा लागतो. त्यासाठी मेंढ्याना एक रुपयांत विमा मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल.

राज्यातील धनगर समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नांसंदर्भात राज्य सरकारची सकारात्मक भूमिका आहे. धनगर समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन सत्तार यांनी दिले.