आजपासून राज्यात सगळीकडे पावसाचा अंदाज! जोरदार वाऱ्यासह विजांचाही कडकडाट होणार…

पुणे : राज्यात शनिवारपासून पुढे चार ते पाच दिवस बहुतांश भागांत वळवाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाच्या सरी सुरू होतील, असा अंदाज आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सध्या मोठ्या उष्णतेचा सामना करावा लागत आहे. यामुळे सगळेच हैराण झाले आहेत.
दरम्यान, राज्यात उकाडा कायम असून, शुक्रवारी अकोला, जळगाव, सोलापूर येथील कमाल तापमान 44, तर पुणे शहरात यंदाच्या मे महिन्यातील विक्रमी 43 अंश तापमानाची नोंद झाली आहे. यामुळे बाहेर न पडण्याचा सल्ला दिला जात आहे. अनेकांना यंदा उष्णतेचा मोठा त्रास झाला.
आता वळवाच्या पावसाचा कोकण (5 ते 8 मे) मध्य महाराष्ट्र (3 ते 8 मे) मराठवाडा (3 ते 8 मे) विदर्भ (3 ते 6 मे) असा इशारा देण्यात आला आहे. सध्या देशभरात हवामानात मोठे बदल होत असून महाराष्ट्रातही वातावरणाचे विविध रंग पाहायला मिळत आहेत. राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण तयार झाले असून, काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे.
दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात अनेक चढ उतार दिसत आहेत. उष्णतेच्या लाटेनंतर हवामान विभागाने सोलापूर, सिंधुदुर्ग, सांगली जिल्ह्याला अवकाळी पावसाचा अलर्ट दिला होता. मागील दोन दिवसांपासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली.
अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा फटका जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून टरबूज बागा मातीमोल झाले आहेत. सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अवकाळी पावसाने काही भागांमध्ये हजेरी लावली. सांगलीत मुसळधार पावसाने वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला. या तिन्हीही जिल्ह्यात बागायतदारांना मोठा फटका बसल्याचे चित्र आहे.