महिलांसाठी आनंदाची बातमी! आता एकही रुपया न भरता महिलांना मिळणार ‘पिंक ई-रिक्षा’, ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज..

पुणे : महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता महिलांना एकही रुपया न भरता ‘पिंक ई-रिक्षा’ मिळणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातून योजनेला सुरुवात झाली असून, या निर्णयामुळे महिलांना स्वबळावर उभं राहण्याची ऐतिहासिक संधी मिळणार आहे. महिला व बालविकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत पूर्वी महिलांना ई-रिक्षा खरेदीसाठी 10% रक्कम स्वतः भरावी लागत होती.

मात्र, आता सोलापूरमध्ये ही रक्कम देखील शासनाने माफ केली आहे. म्हणजेच, महिलांना आता शून्य खर्चात ‘पिंक ई-रिक्षा’ मिळणार आहे. या योजनेत 30% रक्कम राज्य सरकारकडून अनुदान म्हणून दिली जाते, तर 70% रक्कम बँकांकडून कर्ज स्वरूपात मिळते.

रिक्षेची एकूण किंमत 3.73 लाख रुपये असून, महिलांना ती केवळ 2.62 लाखांत मिळणार आहे, तेही कर्जाच्या माध्यमातून. सोलापूरमधील काही महिलांचा सिबिल स्कोअर कमी असल्यामुळे त्यांना कर्ज मिळण्यात अडचण येत होती. यामुळे अनेक पात्र महिलांनी प्रशिक्षणात सहभाग घेतला नव्हता. ही अडचण लक्षात घेऊन 10% स्वतः भरायची रक्कम माफ करण्यात आली. सोलापूर जिल्ह्यात सुमारे 690 महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे.
महिला व बालविकास अधिकारी रमेश काटकर यांनी सांगितले की, या निर्णयामुळे जास्तीत जास्त महिलांना योजना मिळवता येईल आणि त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील.दरम्यान, या योजनेत सहभागी होण्यासाठी महिलांनी 15 ऑगस्ट 2025 पूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.
पात्र महिलांनी आरटीओकडून परवाना घेऊन मोफत प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल. प्रशिक्षणानंतरच त्यांचा सिबिल स्कोअर बँकांकडे पाठवला जाईल. ही योजना महिलांना रोजगार मिळवून देण्याबरोबरच आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणार आहे.
