पुण्यात १०० पेक्षा अधिक पाकिस्तानी नागरिक, पहलगाम हल्ल्यानंतर समोर आली धक्कादायक माहिती..

पुणे : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांना दहशतवादी हल्ल्यात जीव गमवावा लागला. या घटनेचा निषेध केला जात आहे. घटनेतील कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे.
हलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून, सध्या भारतात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुणे शहरात सध्या अशा १११ पाकिस्तानी नागरिकांचे वास्तव्य असल्याचे निष्पन्न झाले आहे.
मंगळवारी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात गोळीबारात २६ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने अटारी-वाघा सीमावरील तपासणी केंद्र तातडीने बंद केले आहे. या मार्गे आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना तत्काळ मायदेशी परतण्यास सांगण्यात आले आहे.
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर पुणे शहरात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची माहिती घेतली असता, १११ नागरिक शहरात वास्तव्यास असल्याचे पोलिसांकडून समोर आले आहे.
या नागरिकांमध्ये ९१ जण दीर्घ मुदतीच्या व्हिसावर भारतात आलेले आहेत, तर २० जण व्हिजिटर व्हिसावर (४५ ते ९० दिवस) दाखल झालेले आहेत. बहुतेक नागरिक हे नातेवाईक भेटण्यासाठी किंवा वैद्यकीय उपचारासाठी भारतात आलेले आहेत. पुण्यातील परदेशी नागरिक नोंदणी केंद्राकडे याबाबतची नोंद झालेली आहे. त्यातील तिघांनी पुणे पोलिसांची परवानगी घेऊन स्वेच्छेने देश सोडला आहे.