भारत-पाकिस्तान युध्दाच्या पार्श्वभूमीवर उद्या मॉकड्रील, पण मॉकड्रील म्हणजे नेमकं काय? १९७१ मध्ये केलेला प्रयोग, जाणून घ्या…

नवी दिल्ली : सध्या देशात पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सगळेच आक्रमक झाले आहेत. भारत आणि पाकिस्तानचे संबंध ताणले आहेत. या पार्श्वभुमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने ७ मे रोजी सर्व राज्यांना मॉक ड्रिल आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत.
यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागरी संरक्षणाची सिद्धता तपासण्यासाठी ही रंगीत तालीम राज्याराज्यात होणार आहे. स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा या मॉक ड्रीलची अंमलबजावणी गरजेप्रमाणे करेल.
दरम्यान, यापूर्वी १९७१ च्या युद्धाच्या वेळेला झालेली मॉक ड्रील झाली होती. त्यानंतर देशात कधीच ती झालेली नाही. त्यामुळे भारत खरंच पाकिस्तान सोबत पूर्ण युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय, मॉक ड्रील म्हणजे काय? त्यात नेमके काय होणार? ती कशी होणार? हे आपण आता जाणून घेऊयात…
मॉक ड्रिलमध्ये गृह मंत्रालयाने पाच गोष्टी करायला सांगितल्या आहेत. त्यात हवाई हल्ला झाल्यास सायरन वाजवून लोकांना अलर्ट करणे. रात्रीच्या वेळी सायरन वाजला तर ब्लॅकआऊट कसे करायचे? हल्ला झाल्यास पडझड झाली आणि काही दुखापती झाल्या तर त्यांना उपचार कसे करायचे किंवा दुखापतग्रस्तांची सेवा कशी करायची? त्यात विद्यार्थी नगरसेवक आणि एनसीसीचे छात्र यांचा सहभाग कसा असला पाहिजे? महत्त्वाच्या स्थापत्यांनाच लपवण्याची प्रक्रिया आणि हल्ला झाल्यास नागरिकांची तातडीने स्थलांतर प्रक्रिया व त्याचा सराव, याप्रमाणे काही निर्देश देण्यात आले असून, मॉक ड्रील करण्यात येणार आहे.
देशात अशा पद्धतीचे मॉक ड्रील १९७१ च्या युद्धानंतर पहिल्यांदाच होत आहे. आजच्या युगात बॉम्बिंग हे कुठेही होते. त्यामुळे पाकिस्तानच्या परिघात येणाऱ्या प्रत्येक राज्यात मॉक ड्रील करणे आवश्यक आहे. नागरिकांनी स्वतःला कसे वाचवायचे हे अजून नागरिकांना माहिती नाही.
त्यामुळे सरकारने हे पाऊल उचलले आहे. सरकारने उचललेले पाऊल हे अनेकांना सावध करणारे आहे. मात्र अनेक जणांच्या मनात तणाव देखील निर्माण होऊ शकतो. पाकिस्तानमधील लोक अन्नधान्याचा साठा करत आहेत, तसे आपल्या येथे सुरू होण्याची शक्यता आहे.