महायुतीचा महामंडळ जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! मंत्रीपद न मिळालेल्यांची इच्छा पूर्ण होणार, जाणून घ्या..

मुंबई : राज्यात महायुतीच्या महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे. यामुळे अनेक इच्छुकांचे याकडे लक्ष लागले आहे. सध्या तिन्ही पक्ष सत्तेत असल्याने याबाबत मंत्रिपद महामंडळ यांच्या वाटण्या करताना अनेक अडचणी येत आहेत. आता महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याचे बोललं जात आहे.
महामंडळाच्या महत्त्वानुसार अ, ब, क वर्गवारी करण्यात आली आहे. सर्वाधिक आमदार असल्याने भाजपच्या वाट्याला 48 टक्के पदे येतील. तर शिवसेनेच्या वाट्याला 29 टक्के, तर राष्ट्रवादीला 23 टक्के महामंडळ मिळणार आहेत. यामुळे लवकरच याबाबत अधिकृतपणे नावे समोर येतील, असे बोलले जात आहे.
राज्यात एकूण 138 महामंडळांमध्ये 785 सदस्य संख्या आहे. तर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री महामंडळांचे वाटप करतील अशी देखील माहिती आता पुढे आली आहे. यामध्ये ज्या आमदारांना मंत्रीपद मिळाले नाही, त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना महामंडळ अध्यक्षपदावर नियुक्त करण्यात येणार आहे. आगामी काळात निवडणूक होणार आहेत.
लवकरच महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, महायुतीच्या आमदारांमध्ये कोणतीही नाराजी राहू नये, यासाठी महायुती प्रयत्नशील आहे. महायुतीमधील तिन्ही पक्षांच्या नाराज आमदारांनी आता महामंडळ अध्यक्षपदासाठी लॉबिंग सुरू केले आहे. महायुतीच्या समन्वय समितीमध्ये महामंडळ वाटपाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे.
ज्यामुळे पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना आणि आमदारांना योग्य स्थान मिळते. या वाटपामुळे पक्षांतर्गत असंतोष कमी होऊन आगामी निवडणुकांमध्ये महायुतीला फायदा होण्याची शक्यता आहे. सध्या सगळेच पक्ष तयारी करत आहेत. महामंडळांवरील नियुक्त्या हा सत्तावाटपाचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो, यामुळे पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत होण्यास मदत होईल, यामुळे सर्वच प्रयत्न करत आहेत.