महायुती सरकारमध्ये खळबळ!! मंत्री विखे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल, शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेतलं अन्…

अहिल्यानगर : राज्याचे जलसंपदामंत्री आणि भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावावर बोगस कर्ज प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास घेतला आहे. त्यांच्या कारखान्यात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
प्रवरानगर येथील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात २००४, २००५ आणि २००७ या कालावधीत राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेतले गेले. हे कर्ज प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळालेच नाही, असा आरोप आहे. यामुळे विखे अडचणीत आले आहेत.
कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळाने या कर्जाचा वापर शेतकऱ्यांसाठी न करता स्वतःच्या फायद्यासाठी केला आहे. सुमारे १० हजार शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेतले गेले असले, तरी त्यांच्या खात्यात एकही रुपया जमा झालेला नाही. यामुळे याबाबत कारवाईची मागणी केली जात आहे.
ही रक्कम थेट कारखान्याच्या हितासाठी वापरण्यात आल्याचा आरोप आहे. या घोटाळ्यात ५४ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये तत्कालीन मंत्री अण्णासाहेब मस्के यांचाही समावेश आहे. असे असताना आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर थेट गुन्हा दाखल झाल्याने महायुती सरकारला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, संचालक मंडळाने औरंगाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली. तिथे उच्च न्यायालयाने स्थानिक न्यायालयाचा आदेश अमान्य केला. मात्र, त्यानंतर या प्रकरणात पुन्हा हालचाली सुरु झाल्या आणि सर्वोच्च न्यायालयाने बोगस कर्ज प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. यामुळे वातावरण तापले आहे.