भारत हाच आमचा देश!! देशात 23 कोटींपेक्षा जास्त मुस्लीम, आम्ही जिनांचा द्विराष्ट्रवाद नाकारला, ओवैसी पाकिस्तानवर बरसले…

नवी दिल्ली : सध्या भारत पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही बाजूंनी सध्या हल्ले सुरू आहेत. भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर तणाव कायम आहे. आज जम्मू-श्रीनगर ते पठाणकोट आणि पोखरणपर्यंत पाकिस्तानचे ड्रोन हल्ल्याचे प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडले आहेत. भारताने १४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद केली आहेत. यामुळे देशात अनेक घडामोडी घडत आहेत.
असे असताना या सगळ्या गोष्टीवर AIMIM चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, भारतामध्ये 23 कोटीहून अधिक मुस्लिम राहतात आणि आमच्या पूर्वजांनी मोहम्मद अली जिना यांचा द्विराष्ट्र सिद्धांत नाकारला होता. आम्ही भारताला आपला देश मानलं आहे आणि याठिकाणीच राहणार आहोत. पाकिस्तान भारताला धर्माच्या आधारावर फोडू इच्छितो.
गेल्या ७५ वर्षांपासून पाकिस्तान भारताविरोधात हाच अजेंडा राबवत आला आहे. पाकिस्तान हिंदू, मुस्लिम आणि इतर समुदायांमध्ये तेढ निर्माण करत आहे. जर पाकिस्तान द्विराष्ट्र सिद्धांत मानतो, तर मग ते अफगाणिस्तान व इराणच्या सीमांवर बॉम्बहल्ले का करत आहेत? अफगाणी आणि इराणीही मुस्लिम आहेत.
यावरून दिसते की, पाकिस्तानची ‘डीप स्टेट’ बेकायदेशीर कृत्यं आणि दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी इस्लामचा केवळ मुखवटा म्हणून वापर करत आहे, असेही ते म्हणाले. यामुळे यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमधील वाढत्या वादावर चिंता व्यक्त केली आहे.