बुलढाण्यात खळबळ! दोन तरुणांनी वेगवेगळ्या ठिकाणी संपवलं जीवन; कारण एकच

बुलढाणा : जिल्ह्यातील चिखली आणि संग्रामपूर तालुक्यात धक्कादायक घटना घडल्या असून दोन तरुणांनी आयुष्याचा शेवट केल्याने खळबळ उडाली आहे. दोन्ही घटनांमागील कारण एकच असल्याचे समोर आले आहे.

हरिश वानखडे (वय २८, रा. सोनाळा, ता. संग्रामपूर) आणि सत्यपाल भिसे (वय २५, रा. मंगरूळ, ता. चिखली) अशी मृत तरुणांची नावे आहेत.
पहिल्या घटनेत संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील हरिश वानखडे यांनी लग्न जुळत नसल्याच्या नैराश्यातून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हरिश हा भूमिहीन आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. कुटुंबीय अनेक वर्षांपासून त्याच्यासाठी स्थळ शोधत होते, मात्र आर्थिक परिस्थितीमुळे विवाह जुळत नसल्याचे सांगितले जाते.

दुसऱ्या घटनेत अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंगरूळ येथे सत्यपाल भिसे यांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली. शिक्षण असूनही नोकरी न मिळणे आणि लग्न न जुळणे यामुळे ते नैराश्यात होते. यामुळे त्यांना व्यसनाचेही व्यसन लागल्याची माहिती आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
