जिल्ह्यात घरसुचीकरण व गृहगणनेला आजपासून सुरुवात; जणगणनेच्या पहिल्या टप्प्याला आजपासून सुरुवात…

पुणे : भारताच्या १६ व्या जनगणनेच्या अनुषंगाने जिल्ह्यात घरसुचीकरण व गृहगणनेच्या प्रकियेला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील नागरिकांनी या कार्यात सक्रियपणे सहभाग घेवून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला जिल्ह्यात १ मे २०२६ पासून सुरुवात करण्यात आली असून १५ मे २०२६ अखेर १ लाख ५३ हजार नागरिकांनी स्व-गणना केली आहे. जनगणनेच्या अनुषंगाने माहिती गोळा करण्यासाठी आजपासून प्रगणक १४ जून २०२६ पर्यंत प्रत्येक घराला भेट देणार आहे. यावेळी प्रगणकांद्वारे गृहगणना करण्यात येणार असून नागरिकांनी आपल्याशी निगडित अचूक माहिती त्यांना द्यावी. आपल्या परिसरातील नागरिकांनाही अद्ययावत माहिती देण्यास प्रोत्साहित करावे.
घरगणनेच्या अनुषंगाने पुणे व पिंपरी चिंचवड महानगर पालिकेसह जिल्ह्यात प्रगणक आणि पर्यवेक्षकांसह सुमारे ३० हजार क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या कामासाठी, भारताचे महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांच्या कार्यालयाने आखून दिलेली संरचित पाच-स्तरीय प्रशिक्षण प्रणाली लागू करण्यात आली आहे, अशी माहिती श्री. डुडी यांनी दिली आहे.

जनगणना कायदा १९४८ च्या तरतुदींनुसार राबवला जाणारा अत्यंत महत्त्वाचा राष्ट्रीय उपक्रम आहे. प्रभावी धोरण निर्मितीला पूरक ठरणारा आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात योगदान देणारा विश्वसनीय माहितीचा संग्रह (डेटा) निर्माण करण्यासाठी सक्रिय लोकसहभाग आवश्यक आहे, नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकाला संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन श्री. डुडी यांनी केले आहे.
