राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस! ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, जाणून घ्या महत्वाची माहिती…

पुणे : राज्यात सध्या पावसाने जोर धरला आहे. हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
विशेषतः मुंबई, ठाणे, पुणे, कोकण किनारपट्टी, तसेच संपूर्ण विदर्भ आणि मराठवाडा विभागांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोकणातील हवामान पावसाला पूरक बनले आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अनुभव येत आहे.
येत्या काही तासांत याठिकाणी पावसाचा जोर अधिक वाढू शकतो, असे भाकीत भारतीय हवामान विभागाने वर्तवले आहे. परिणामी राज्याच्या अन्य भागांवरही पावसाचा प्रभाव दिसून येईल आणि काही जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, विदर्भातील अकरा जिल्ह्यांत गेल्या ११ तासांपासून जोरदार पाऊस सुरू असून, पुढील २४ तासांतही अशीच स्थिती राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मराठवाड्यातही अनेक जिल्ह्यांत मागील दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. नांदेड, हिंगोली, परभणी, छत्रपती संभाजीनगरसह अनेक भागांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.