शेतकऱ्यांसाठी सरकारची मोठी घोषणा! आता शेत पाणंद रस्त्यांसंदर्भात अतिक्रमण हटवण्यासाठी पुरवले जाणार पोलीस बळ..

मुंबई : शेत रस्ते आणि पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी आता पोलिस बंदोबस्त पुरवण्यात येणार असून, गृहविभागाने यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबत अनेकदा आपल्याला शेतात जाताना अनेक अडचणी येतात. यामुळे वाद देखील वाढत जातात.
यामुळे आता शेतकऱ्यांना शेती कामात अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांविरोधात राज्य सरकारने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या निर्णयामुळेअतिक्रमणविरोधी मोहिमेला वेग येणार असून, शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांच्या मागणीला न्याय मिळण्याची शक्यता आहे. आता याच अनुषंगाने गृह विभागाकडून पोलिस बंदोबस्ताची घोषणा करण्यात आली आहे.
ज्यामुळे अतिक्रमण काढताना होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या अडचणी दूर होतील. अनेक भागांत शेतीशी संबंधित रस्त्यांवर खासगी व्यक्तींचे बेकायदेशीर अतिक्रमण झाले आहे. हे अतिक्रमण काढून टाकण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून वारंवार होत होती. मजुरांची टंचाई भासत असल्याने यंत्रांच्या मदतीने शेती केली जाते.
असे असताना मात्र शेत रस्त्यांवर अतिक्रमण झाल्यामुळे ट्रॅक्टर, मशीनरी व वाहने शेतात नेणे अवघड होत होते. यामुळे पिकांची वेळेवर लागवड, कापणी आणि वाहतूक खोळंबत होती. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत होते आणि शेतीचा उत्पादन खर्चही वाढत होता. यामुळे याबाबत शेतकरी मागणी करत होते. अखेर हा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत अतिक्रमण हटवण्याचा मुद्दा गांभीर्याने चर्चेला आला. यामध्ये जिल्हा प्रशासन अतिक्रमण हटवण्यासाठी मोहिम राबवताना स्थानिक पोलिस यंत्रणेचा वापर करू शकते. यामुळे अतिक्रमण करणाऱ्यांचा दबाव किंवा विरोध कमी होईल आणि न्याय मिळेल.
तसेच ग्रामपंचायत स्तरावरही शेत रस्त्यांच्या नकाशांची तपासणी करून, मूळ मार्गांची नोंद घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळेल, यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. याबाबत आता कोणीही शेतकऱ्यांची अडवणूक करून नये.