पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! आता वाहतूक कोंडीतून होणार कायमची सुटका, तब्बल 12 हजार कोटींच्या रस्ता प्रस्तावित, रोजगारही वाढणार…

पुणे : पुणे महानगर परिसरातील कोंडी कमी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शिरूर-खेड-कर्जत पनवेल असा नवीन रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. या कामासाठी १२ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याबाबत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी माहिती दिली. भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम पुणे प्रादेशिक विभागाची आढावा बैठक घेतली.
यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांचे वढु येथील समाधीस्थळ आणि तुळापूर येथील बलिदानस्थळ विकास आराखड्यातील कामांचे चित्रफीतीद्वारे सादरीकरण करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचे पुनुरुज्जीवन करण्याबाबत टप्प्याटप्प्याने काम हाती घ्यावयाचे असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.
या किल्ल्यांना रस्त्यांची जोडणी करायची आहे. पर्यटक अधिक काळ तेथे थांबतील यादृष्टीने पायाभूत सुविधा व आकर्षणकेंद्रे निर्माण कशी करता येतील याबाबत अभ्यास करावा. पर्यटन हा मोठा रोजगार देणारा उद्योग असून, राज्यात या क्षेत्राच्या विकासाला मोठा वाव आहे. त्यासाठी महत्त्वाची पर्यटनस्थळे मोठ्या रस्त्यांनी जोडणे आवश्यक असल्याचे देखील शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.
यावेळी मुख्य अभियंता अतुल चव्हाण, पुणे मंडळाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर, सोलापूर मंडळाचे एस. एस. माळी, सातारा मंडळाचे एस. बी. रोकडे, कोल्हापूर मंडळाचे तुषार बुरुड, दक्षता व गुण नियंत्रण मंडळाचे अधीक्षक अभियंता सुरेंद्र कंकरेज यांच्यासह विभागातील कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
शिरूर-खेड-कर्जत पनवेल या रस्त्यामुळे पुणे शहराबरोबरच शिक्रापूर-चाकण-तळेगाव रस्त्यावरील वाहतूक कोंडी संपणार आहे. वाहतुकीत सुधारणा करण्यासाठी हा प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे.
हा प्रकल्प १२ हजार कोटी रुपयांचा आहे.
हा प्रकल्प बांधा वापरा व हस्तांतरित करा’ (बीओटी) या तत्त्वावर राबविला जाणार आहे. तसेच द्रुतगती मार्गावरील वाहतुकीचा भारदेखील कमी होणार आहे. हा प्रकल्प १३५ किलोमीटर लांबीचा आहे. यामुळे अनेक फायदे होणार असून गुंतवणूक देखील वाढणार आहे.