साताऱ्यात चार महिन्यांपूर्वी ईव्हीएमवर पराभव झालेल्या माजी आमदाराने बॅलेट पेपरवर मिळवला दणदणीत विजय! विजयाची राज्यात चर्चा…

सातारा : चार महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूकीत महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्या. राज्यात महायुतीविरोधातील वातावरण असतानाही त्यांचे सरकार आले. यामुळे हा निकाल अनेकांना पटलं नाही. हा लोकांनी दिलेला निकाल नसून ईव्हीएम मशीनमधून मिळवलेला निकाल असल्याची टीका विरोधकांनी केली.
असे असताना मात्र आता विरोधकांचा हा आरोप खरा ठरवणारा प्रकारच साताऱ्यात घडला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कराड तालुक्यातील सहयाद्री सहकारी साखर कारखाना निवडणूकमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. बॅलेट पेपरवर झालेल्या या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमवर जिंकलेल्या भाजप आमदाराला बॅलेट पेपरवर निम्मी मतंही नाहीत.
यामुळे या निकालाची राज्यात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. कराडमधील सह्याद्रा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलला भरघोस यश मिळाले तर भाजपचे विद्यमान आमदार मनोज घोरपडे यांच्या गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्त्वातील पी.डी. पाटील पॅनेलचे सर्व उमेदवार 7500 ते 8000 हजारांच्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. यामुळे या निकालाकडे वेगळ्या प्रकारे बघितले जात आहे. याचे कारण म्हणजे विधानसभा निवडणुकीत भाजपचे विद्यमान आमदार मनोज घोरपडे यांनी जवळपास ५० हजार मतांनी विजय मिळवला होता.
याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे म्हणाल्या की, 4 महिन्यांपूर्वी 50 हजार मताधिक्याने जिंकलेला भाजप पार्टीचा एक आमदार, बॅलेट पेपर वर घेतलेल्या ‘सहयाद्री कारखाना’ निवडणूकीमध्ये विजयी उमेदवाराच्या अर्धी मते पण घेऊ शकला नाही. तसेच रोहित पवार म्हणाले कि, विरोधकांचा 21~0 असा दणदणीत धुव्वा उडवत सातारा जिल्ह्यातील ‘सह्याद्री’वर विजयाचा झेंडा डौलाने फडकवल्याबद्दल माजी मंत्री बाळासाहेब पाटील साहेब आपलं मनःपूर्वक अभिनंदन.
आपल्या नेतृत्वाखाली हा कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा कारभार करतच होता आणि पुढंही करेल, असा विश्वास आहे, त्यासाठी आपणास मनापासून शुभेच्छा! विशेष म्हणजे चार महिन्यांपूर्वीच EVM वर झालेल्या निवडणुकीत भाजपचा उमेदवार निवडून आला आणि आज बॅलेट पेपरवर निवडणूक झाली असता जनतेच्या मनातील खरा निकाल लागला, हे या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झालं. असे रोहित पवार म्हणाले.