काँग्रेसने सगळं काही दिलं, ४५ वर्षे आमदारकी घरात, अखेर भाजपात प्रवेश करताना संग्राम थोपटे यांनी काँग्रेस सोडण्याचे खरं कारण सांगितलं….

पुणे : भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी अखेर काँग्रेसला सोडले असून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे पुणे जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आणि काँग्रेसकडून योग्य सन्मान न मिळाल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांच्या मतदारसंघात मोठा मेळावा होणार आहे. संग्राम थोपटे हे गेल्या अनेक वर्षांपासून आमदार होते. याबाबत त्यांनी खदखद बोलून दाखवली आहे.
थोपटे म्हणाले की, विधीमंडळामध्ये भाजप नेते मला वारंवार सांगायचे संग्राम निर्णय घ्या. किती दिवस तुझ्यावर अन्याय होतोय. पण मी एक विचाराला बांधलेला कार्यकर्ता असल्यामुळे या विचारापर्यंत पोहोचत नव्हतो. मात्र मला निर्णय घ्यावा लागला. खंत एवढीच आहे की निष्ठा राखून पक्षाचं काम केलं पण निष्टेच फळ मिळालं नाही.
संघर्षाच्या भूमिकेतून सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, नगरपालिका असतील तिथे एकहाती सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला. पक्षाची ताकद मिळो ना मिळो काँग्रेस पक्ष वाढवण्याचं प्रामाणिक काम केल्याचं संग्राम थोपटे म्हणाले. विधानसभा निवडणुकीमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं.
लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा धर्म पाळला. माझ्या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजपने प्राधान्य द्यावं अशीा आग्रहाची विनंती मी करतो, असे संग्राम थोपटे यांनी म्हटले आहे. यामुळे येणाऱ्या काळात पक्ष त्यांना आमदारकी देणार का? हे लवकरच समजेल.