आषाढी वारीसाठी विठ्ठलभक्तांना मोठी भेट! पुणे-मिरज, कोल्हापूर-कुर्डुवाडी मार्गावर धावणार विशेष रेल्वे; पाहा वेळापत्रक

पुणे : आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो विठ्ठलभक्त पंढरपूरकडे रवाना होत असतात. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, पंढरपूर वारीसाठी विशेष अनारक्षित रेल्वे गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. या विशेष गाड्यांमुळे कोल्हापूर, पुणे, मिरज आणि परिसरातील भाविकांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.
कोल्हापूर – कुर्डुवाडी विशेष गाडी

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 22 जुलै ते 29 जुलै या कालावधीत कोल्हापूर–कुर्डुवाडी–कोल्हापूर विशेष अनारक्षित रेल्वे (गाडी क्र. 01209/01210) दररोज धावणार आहे.
ही विशेष गाडी मिरज, आरग, बेळंकी, सलगरे, कवठेमहांकाळ, लंगरपेठ, ढालगाव, जत रोड, म्हैसाळ आणि पंढरपूर या स्थानकांवर थांबा घेणार आहे.

पुणे – मिरज – पुणे विशेष गाडी
याशिवाय 23 जुलै ते 29 जुलै या कालावधीत पुणे–मिरज–पुणे (पंढरपूरमार्गे) विशेष अनारक्षित रेल्वे (गाडी क्र. 01207/01208) देखील चालवण्यात येणार आहे.

ही गाडी पुणे स्थानकातून सकाळी 8.40 वाजता सुटून सायंकाळी 6.45 वाजता मिरज येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी मिरजहून सायंकाळी 7.30 वाजता सुटेल आणि पंढरपूरमार्गे पहाटे 4.30 वाजता पुण्यात दाखल होईल.
आषाढी वारीसाठी दरवर्षी लाखो भाविक पंढरपूरला जात असल्याने रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदाच्या वारीत विठ्ठलभक्तांचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि सुलभ होण्यास मदत होणार आहे.