तुमच्या आजीने त्यांचे कौतूक केले होते!! सावरकरांबाबत वक्तव्यावरून राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने फटकारले…

नवी दिल्ली : लोकसभेचे विरोधी पक्षनेते काँग्रेसचे खासदार राहुल गांधी सध्या अडचणीत आले आहेत. त्यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यावरून सर्वोच्च न्यायालायने गुरूवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबत सुनावणी पार पडली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
यावेळी कोर्टाने सांगितले की, स्वातंत्र्यसैनिकांविषयी टिपण्णी करण्यास परवानगी दिली जाणार नाही. अशा वक्तव्यांची पुनरावृत्ती झाल्यास स्वतःहून कारवाई केली जाईल, असा इशाराही सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यामुळे आता पुढील काळात अशी वक्तव्य करताना त्यांना विचार करावा लागणार आहे.
कोर्टाने सांगितलं की, तुमच्या आजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या सावरकरांचे कौतूक करत होत्या, असेही न्यायालयाने म्हटले आहे. राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याबद्दल केलेले विधान बेजबाबदार होते. त्यांनी हे बोलायला नको होते, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.
त्याचबरोबर, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना या प्रकरणात दिलासाही दिला आहे. सावरकरांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल राहुल गांधी यांच्याविरुद्ध जारी करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यातील समन्स रद्द करण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयाने नकार दिला होता.
आता न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला खंडपीठाने स्थगिती दिली. दुसरीकडे या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारला नोटीसही बजावली आहे. येणाऱ्या काळात राहुल गांधी यांना याबाबत वक्तव्य करताना काळजी घ्यावी लागणार आहे.