धान्य वाचवण्याच्या प्रयत्नात अनर्थ! विषारी वायूमुळे दोन चिमुकल्या बहिणींचा मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील बाळापूर येथे 5 ऑगस्टच्या रात्री ही धक्कादायक घटना घडली. घरात साठवलेल्या हरभऱ्याला कीड लागू नये म्हणून ठेवलेल्या कीटकनाशकातून विषारी वायू पसरल्याने एकाच कुटुंबातील दोन चिमुकल्या सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला.
आरोही डेबेकर (6) आणि आराध्या डेबेकर (4) अशी मृत बहिणींची नावे आहेत. मल्लेश डेबेकर यांनी घरात साठवलेल्या हरभऱ्याच्या पोत्यांमध्ये कीटकनाशक ठेवले होते. रात्री कुटुंबातील चारही सदस्य त्याच खोलीत झोपले होते. बंद खोलीत औषधाचा विषारी वायू पसरल्याने सर्वांची प्रकृती अचानक बिघडली.

रात्रीच्या सुमारास आई-वडील आणि दोन्ही मुलींना त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्याची धावपळ सुरू झाली. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच दोन्ही चिमुकल्या बहिणींचा मृत्यू झाला.


या घटनेत मुलींचे आई-वडीलही बाधित झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे बाळापूरसह संपूर्ण धर्माबाद तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.