आता शिक्षक होण्यासाठी ‘बीएड’च करावे लागणार ; डीएड कायमचे बंद…!

मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता शिक्षक होण्यासाठी बीएड करणे बंधनकारक असणार आहे. डीएड आता कायमचे बंद होणार आहे. बारावीनंतर चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात शिक्षणशास्त्र विषय घेऊन विद्यार्थ्यांना ‘बीएड’च करावे लागणार आहे. राज्यातील शिक्षकांच्या दृष्टीने आणि शिक्षण क्षेत्रासाठी ही मोठी बातमी आहे.
‘बीएड’मध्ये आता स्पेशलायझेशन असणार आहे. केंद्र सरकारने नवीन राष्ट्रीय धोरण राबवण्यास राज्याकडून मान्याता मिळाली आहे. त्यानुसार राज्यातील सर्व अकृषिक विद्यापीठांमध्ये जून २०२३-२४ पासून या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. विद्यार्थ्यांना चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर शेवटच्या सेमिस्टरला ज्या क्षेत्रात आवड आहे, त्यास त्यासंबंधीची सहा महिने अॅप्रेटायशेन, इंटर्नशिप करावी लागेल.
त्यानंतरच विद्यार्थी नोकरी करण्यासाठी पूर्णपणे तयार होतील. बारावीनंतर नव्याने पदवीला प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांनाच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा पॅटर्न लागू असणार आहे. सध्या शिकत असलेल्यांना हा पॅटर्न लागू असणार नाही.
विद्यार्थ्यांना विषय निवडीस वाव
सध्याच्या शैक्षणिक धोरणानुसार, तीन वर्षांची पदवी पूर्ण करण्यासाठी पाच वर्षांची कालमर्यादा ठरलेली आहे. मात्र आता, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी सात वर्षांचा काळ विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे. कोणत्या विषयाचे शिक्षक व्हायचे यानुसार विद्यार्थ्यांना विषय निवडण्यास वाव मिळणार आहे.