पुरंदर विमानतळ आंदोलनात सुप्रिया सुळे यांची उडी, ग्रामस्थांची भेट घेऊन केली मोठी मागणी..

पुरंदर : पुरंदर येथील विमानतळाबाबत येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. यामुळे तीव्र आदिलन केले जात आहे. आता खासदार सुप्रिया सुळे यांनी याठिकाणी भेट देत चर्चा केली. त्या म्हणाल्या, बारामती लोकसभा मतदारसंघातील कुंभारवळण, ता. पुरंदर येथे प्रस्तावित विमानतळामुळे बाधित होणाऱ्या ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
शांततेत आंदोलन करणाऱ्या बाधित ग्रामस्थांवर शासनाकडून बळाचा वापर करण्यात आला. तरुणांवर लाठीहल्ला करुन त्यांना जखमी करण्यात आले. काहींना अटक देखील करण्यात आली. या आंदोलनादरम्यान अंजली महादेव कामठे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करुन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
याप्रसंगी बोलताना अटक केलेल्या सर्वांना तातडीने सोडण्यात यावे या मागणीसाठी पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचे सांगितले. याखेरीज ग्रामस्थ आणि शेतकरी यांची एकत्रित अशी कृती समिती स्थापन करुन जेथे विरोध होणार नाही तेथे विमानतळ करावे अशी मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे करावी,
मी त्याचा पाठपुरावा करेन असा शब्द यावेळी दिला. शासनाने हे प्रकरण अतिशय संवेदनशीलतेने मानवी भूमिकेतून हाताळणे गरजेचे होते. जनभावना लक्षात घेऊन संयम आणि संवेदनशीलता दाखविणे आवश्यक होते. परंतु शासनाने बळाचा वापर करुन जनहिताच्या विरोधात काम केले आहे.
यावेळी ग्रामस्थांसोबत बोलताना आजी-माजी लोकप्रतिनिधी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा देऊ, अशी आग्रही भूमिका मांडली. यामुळे येणाऱ्या काळात प्रकरण अजूनच चिघळणार की शांत होणार हे लवकरच समजेल. याबाबत विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत.