“अजित पवारांचे वक्तव्य खोडण्याचा प्रयत्न चुकीचा” सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप; पुण्यात राजकीय वातावरण तापले

पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांच्या वक्तव्यावरून मोठा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले की, “अजित पवार काय बोलले ते खोडून काढायचं पाप काही लोकांनी केलं आहे,” असा थेट आरोप करत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.

सुळे यांनी सांगितले की, सध्याच्या राजकीय परिस्थितीत अनेक वक्तव्ये चुकीच्या पद्धतीने मांडली जात आहेत किंवा त्यांचा अर्थ बदलून जनतेसमोर सादर केला जात आहे. त्यामुळे सत्य परिस्थिती समोर येणे गरजेचे आहे. “लोकशाहीत नेत्यांच्या वक्तव्यांचा विपर्यास करणे योग्य नाही,” असे त्या म्हणाल्या.
त्यांनी पुढे सांगितले की, पुण्यातील वाढती गुन्हेगारी हा अत्यंत गंभीर विषय आहे. “पुण्यात क्राईम वाढत आहे, हा पहिला विषय आहे,” असे सांगत त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत, पोलिस यंत्रणेवरही त्यांनी टीका केली. “व्हिडिओ सर्व चॅनलवर दिसतात, मग पोलिसांना ते दिसत नाहीत का?” असा सवाल त्यांनी केला.

सुळे यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या गुन्हेगारी आकडेवारीतील तफावतीवरही प्रश्न उपस्थित केला. “राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा डेटा वेगवेगळा येतो, त्यामुळे खरा डेटा कोणता हा मोठा प्रश्न आहे,” असे त्या म्हणाल्या. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

राजकीय आघाडीबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार आहे. स्थानिक मुद्द्यांवर चर्चा सुरू असून निवडणुकीच्या तयारीला वेग देण्यात येत आहे. कोणाला उमेदवारी द्यायची हा त्या त्या पक्षाचा अंतर्गत निर्णय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अजित पवार गटातील उमेदवारी व अंतर्गत वादांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी संयमी भूमिका घेतली. “मी कोणालाही मार्गदर्शन करत नाही, प्रत्येक पक्षाचे अंतर्गत निर्णय वेगळे असतात,” असे त्या म्हणाल्या.
या संपूर्ण पार्श्वभूमीवर सुळे यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, पुढील काही दिवसांत यावर अधिक राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.