ऑपरेशन सिंदूर योग्य, पण धर्म विचारणाऱ्या त्या चौघांनाही संपवा, पहलगाम पीडितेची सरकारकडे विनवणी…


नवी दिल्ली : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्याकाही दिवसांनंतर भारताने दहशतवादाच्या बालेकिल्ल्यात प्रवेश करून जोरदार हल्ला केला. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमध्ये १०० किमी आत घुसून लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीनचे ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला.

अशातच आता जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या एका महिलेने भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईचे समर्थन केले आहे. मात्र, ज्या दहशतवाद्यांनी धर्म विचारून निरपराधांना मारले, त्या नराधमांनाही अशीच शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

इंदूर येथील रहिवासी असलेल्या जेनिफर नथानिएल यांचे पती सुशील नथानिएल (वय. ५८) यांचा २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईनंतर, जेनिफर यांनी ‘जे घडले ते योग्यच आहे’ अशी प्रतिक्रिया दिली.

परंतु, ज्या चार दहशतवाद्यांनी प्रत्यक्ष हल्ला करत, धर्म विचारून माझ्या पतीची आणि इतर निष्पाप पर्यटकांची हत्या केली, त्या नराधमांनाही शोधून ठार केले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. या चौघांनी असे कृत्य केले जे एखादा प्राणीही करणार नाही. मला फक्त याचा हिशोब हवा आहे आणि या लोकांनाही तशीच शिक्षा मिळाली पाहिजे. या दहशतवाद्यांनाही मारायला हवं, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप आणि वेदना व्यक्त केल्या.

सुशील नथानिएल हे एलईसीमध्ये कार्यरत होते. ते पत्नी जेनिफर, मुलगी आकांक्षा (वय ३५) आणि मुलगा ऑस्टिन उर्फ गोल्डी (वय २५) यांच्यासोबत काश्मीरला पर्यटनासाठी गेले होते. २२ एप्रिल रोजी पहलगाममधील मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन या पर्यटनस्थळी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला, ज्यात सुशील यांचाही समावेश होता.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!