भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराचा मोठा निर्णय..

मुंबई : सध्या भारत-पाकिस्तानमधील वातावरण तापले आहे. पाकिस्तानने केलेल्या कुरापतीनंतर भारताने जोरदार उत्तर दिले आहे. भारताने पाकिस्तानवर ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत जोरदार एअरस्ट्राईक केला. यात पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त करण्यात आले.
यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारताच्या १५ शहरांवर हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय हवाई दलाने तो हाणून पाडला. त्यानंतर भारताने प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानच्या लाहोरमधील एअर डिफेन्स आणि रडार सिस्टीम ड्रोन हल्ल्यांद्वारे उद्ध्वस्त केली.
या पार्श्वभूमीवर सध्या भारतातील महत्त्वाच्या शहरांमध्ये तसेच सीमालगत भागात सावधगिरी बाळगली जात आहे. भारत-पाकिस्तानात सध्या सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सतर्कता बाळगली जात आहे. याचाच भाग म्हणून मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराने मोठा निर्णय घेतला आहे.
मंदिर प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव येत्या रविवारपासून भाविकांना हार आणि नारळ अर्पण करण्यास मनाई केली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, याबाबत अधिकृत माहिती मंदिर प्रशासनाकडून लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. या निर्णयाला भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सध्याची परिस्थिती पाहता भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे आवश्यक आहे, त्यामुळे हा बदल करण्यात आला आहे.