ठाकरेंना मोठा धक्का! ‘त्या’ 6 खासदारांबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; जाणून घ्या काय घडलं

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिली होती. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे.
काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या लोकसभेतील नऊ खासदारांपैकी सहा खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला. या खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करून शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. या घडामोडीनंतर लोकसभेतील शिंदे गटाचे संख्याबळ 13 खासदारांवर पोहोचले आहे.

विलिनीकरणाच्या निर्णयाला ठाकरे गटाचे आव्हान
सहा खासदारांच्या गटाला शिवसेना शिंदे गटात विलीन होण्यास लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिली होती. या निर्णयाला ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. लोकसभा अध्यक्षांचा विलिनीकरणाचा निर्णय चुकीचा असल्याचा दावा करत, त्याला स्थगिती देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती.


मात्र, सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे सहा खासदारांच्या शिंदे गटातील विलिनीकरणावर सध्या कोणतीही न्यायालयीन स्थगिती नाही. हा निर्णय ठाकरे गटासाठी राजकीयदृष्ट्या मोठा धक्का मानला जात आहे.
लोकसभा अध्यक्ष आणि सहा खासदारांना दोन आठवड्यांची मुदत
दरम्यान, सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची पुढील प्रक्रिया सुरू ठेवली आहे. लोकसभा अध्यक्ष तसेच शिंदे गटात गेलेल्या सहा खासदारांनी दोन आठवड्यांच्या आत आपले उत्तर दाखल करावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
त्यामुळे स्थगिती नाकारण्यात आली असली तरी या प्रकरणाचा अंतिम निकाल अद्याप झालेला नाही. आता लोकसभा अध्यक्ष आणि संबंधित सहा खासदार न्यायालयासमोर काय भूमिका मांडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सहा खासदारांच्या बंडामुळे ठाकरे गटाची लोकसभेतील ताकद कमी झाली असून, दुसरीकडे शिंदे गटाचे संख्याबळ 13 खासदारांपर्यंत वाढले आहे.