खुशखबर! मुंबईहून ‘या’ शहरासाठी सुरू होणार स्वातंत्र वंदे भारत एक्सप्रेस, जाणून घ्या..

मुंबई : महाराष्ट्राला लवकरच आणखी एका नव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असे चित्र तयार होत आहे. महाराष्ट्रात सध्या ११ वंदे भारत एक्सप्रेस सुरू असून लवकरच आणखी काही महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, नागपूर ते बिलासपूर, नागपूर ते इंदोर, नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू आहे.
गेल्या काही दिवसांपासून मंगळुरू-मडगाव या ‘वंदे भारत’ला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे रेल्वेने मंगळुरू-मडगाव आणि मुंबई-मडगाव या ‘वंदे भारत’च्या एकत्रीकरणाची तयारी सुरू केली असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये समोर आल्या आहेत.
कर्नाटकमधील लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे याबाबत रेल्वे बोर्ड, मध्य रेल्वे, कोकण रेल्वे आणि दक्षिण रेल्वे यांच्यात बैठक होऊन वेळापत्रकावर चर्चा सुद्धा करण्यात आली. पण, मंगळुरू-मडगाव व मुंबई-मडगाव या दोन गाड्यांचे एकत्रीकरण झाल्यास महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी हे फायद्याचे ठरणार नाही असा दावा प्रवासी संघटनांच्या माध्यमातून केला जात आहे.
कोकण विकास समितीने सांगितल्याप्रमाणे या दोन्ही वंदे भारत ट्रेन एकत्र झाल्यास खेड, रत्नागिरी, कणकवली, थिवी या स्थानकांसाठी ‘पूल्ड कोटा’ व ‘रिमोट लोकेशन कोटा’ निर्धारित केला जाईल. यामध्ये क्षमतेच्या केवळ १५ ते २० टक्के जागा उपलब्ध असतात.
दरम्यान, उर्वरित जागा दक्षिणेकडील स्थानकांना जाऊन अत्यल्प कोटा दिल्यामुळे महाराष्ट्रातील प्रवाशांना तिकिटे मिळू शकणार नाहीत. हेच कारण आहे की कोकण विकास समितीने मंगळूर ते मुंबई दरम्यान स्वातंत्र्य वंदे भारत ट्रेन सुरू करावी अशी आग्रही मागणी केलीये.
तसेच सध्याची मडगाव सीएसएमटी वंदे भारत ट्रेन तशीच चालू ठेवावी असे म्हटले आहे. तसेच स्वातंत्र मंगळुरू मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ला सध्याच्या ‘वंदे भारत’ला नसलेले सावंतवाडी, वैभववाडी, चिपळूण, माणगाव, कुडाळ हे थांबे दिले पाहिजेत असेही कोकण विकास समितीकडून रेल्वेला सुचवण्यात आले आहे.