उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवणाऱ्या ‘या’ ५ फळांचं सेवन करा, थकवा होईल दूर…

पुणे : उन्हाळ्यात उष्णतेमुळे लोक अस्वस्थ होतात. पाण्याच्या कमतरतेमुळे, शरीर अनेकदा लवकर डिहायड्रेट होते, ज्यामुळे थकवा येतो. यामुळे थकवा, चक्कर येणे, त्वचेचा कोरडेपणा अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे उन्हाळ्यात शरीर हायड्रेटेड ठेवणे अत्यंत आवश्यक असते.
एका अहवालानुसार, आपल्या शरीराला लागणाऱ्या एकूण पाण्यापैकी २०% पाणी अन्नातून तर उर्वरित ८०% पाणी थेट पिण्याच्या पाण्यातून मिळते. म्हणूनच, उन्हाळ्यात भरपूर पाणी पिण्यासोबतच अशा फळांचे आणि भाज्यांचे सेवन आवश्यक आहे, ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते.
‘हे फळ उन्हाळ्यात आहारात नक्की हवे..
काकडी – 96% पाणी आणि थेट थंडावा
काकडी हे उन्हाळ्यातील सर्वोत्तम हायड्रेटिंग फूड मानलं जातं. यात सुमारे ९६% पाणी असतं. ती रोजच्या आहारात समाविष्ट केल्यास शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात, आणि शरीरात थंडावा निर्माण होतो.
स्ट्रॉबेरी – चविष्ट आणि ताजेपणा देणारे फळ
स्ट्रॉबेरीमध्ये ९१% पाणी असतं. यामध्ये व्हिटॅमिन C आणि फायबर मुबलक प्रमाणात असतं, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतं. उन्हाळ्यात स्ट्रॉबेरी खाल्ल्याने शरीरात उष्णतेचा परिणाम कमी होतो आणि थकवा दूर राहतो.
टरबूज – गोडसर थंडावा आणि 92% पाणी
उन्हाळा आणि टरबूज यांचं नातं घट्ट आहे. टरबूजमध्ये सुमारे ९२% पाणी असतं. ते खाल्ल्याने शरीर थंड राहतं, पाण्याची कमतरता भरून निघते आणि त्वचेवरही सकारात्मक परिणाम होतो. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ए, सी, बी6 भरपूर प्रमाणात असतात.
टोमॅटो – अँटीऑक्सिडंट्ससह 94% पाणी
टोमॅटोमध्ये ९४% पाणी असतं. यामध्ये लाइकोपीन नावाचं अँटीऑक्सिडंट असतं, जे पेशींचे रक्षण करतं आणि उष्णतेमुळे होणाऱ्या त्वचेच्या समस्यांपासून संरक्षण करतं.
मुळा – शरीराला थंड ठेवणारा घटक
मुळ्यात ९५% पाणी असतं. तो केवळ पाणीपुरवठा करत नाही तर व्हिटॅमिन C आणि फायबरचा स्रोतही आहे. यामुळे शरीरातील दाह आणि उष्णतेमुळे होणारे त्रास कमी होतात.