भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान; म्हणाले, सध्या देशात..

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या आणि संघर्षमय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देशविरोधी वक्तव्ये आणि समाजमाध्यमांवरील नकारात्मक प्रचारावर तीव्र शब्दांत टीका केली आहे.
लखनऊच्या सिटी मॉन्टेसरी स्कूल मध्ये आयोजित एका कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, सध्या देशात जी परिस्थिती आहे, त्याकडे पाहता अनेकदा समाजमाध्यमांवर काही अशा पोस्ट किंवा ट्विट्स दिसून येतात, जे देशविरोधी असतात आणि आपल्या सैन्याच्या मनोधैर्याला खच्ची करण्याचा प्रयत्न करतात.
अशी परिस्थिती का निर्माण होते? ही भूमी आपल्या सर्वांची माता आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याच गोष्टीचा पुनरुच्चार केला आहे. आपले सर्वांचे अंतिम लक्ष्य ‘राष्ट्र प्रथम’ हेच असायला हवे आणि हे प्रत्येक भारतीयाचे (Indian) ध्येय असले पाहिजे.
त्यांनी पुढे सांगितले की, जीवन कधीही एकपक्षीय असू शकत नाही आणि विद्यार्थ्यांनी जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये आपले महत्त्वपूर्ण स्थान निर्माण करावे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी एक पोस्ट देखील केली, ज्यात त्यांनी लिहिले की, “लखनऊ येथे आयोजित ‘शिक्षक आभार समारंभा’त सहभागी झालो.
या प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करून त्यांचे उत्साहवर्धन केले. मला पूर्ण विश्वास आहे की, शिक्षणाला संस्कार, राष्ट्रभक्ती आणि भारताच्या उज्ज्वल परंपरांशी जोडून भारतीय संस्कृतीला अधिक बळकट करण्यासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे पुढे जाऊ.
“विकसित भारत तोच असेल, जिथे प्रत्येक नागरिक सुरक्षित, समृद्ध आणि आत्मनिर्भर असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिलेला ‘विकसित भारताचा’ संकल्प पूर्ण करण्यामध्ये शिक्षण आणि शिक्षकांची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. शिक्षक केवळ शैक्षणिकदृष्ट्या सक्षम पिढीच घडवत नाहीत, तर नैतिकदृष्ट्याही बळकट आणि राष्ट्रनिष्ठ पिढी घडवण्याचे पवित्र कार्य करत आहेत, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.