“मुख्यमंत्री साहेब आम्हाला…”; आरक्षणाच्या लढाईसाठी तरुणानं उचललं टोकाचं पाऊल ; मृत्यूपूर्वी काय लिहिलं चिठ्ठीत ?

धाराशिव : मराठा आरक्षणाच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला. यावरून आता वातावरण तापलं असुन हैदराबाद गॅजेटमधील नोंदीनुसार सध्या ओबीसी प्रवर्गात असलेल्या बंजारा समाजाचा समावेश एसटी (अनुसूचित जमातीमध्ये) प्रवर्गामध्ये करावा, ही मागणी आता राज्यात जोर धरू लागली आहे. या आरक्षणाच्या मागणीसाठीच आता धाराशिवच्या मुरूममधील नाईकनगर येथील तरुणांन गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मृत्यूपूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठीने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातील मुरूम शहरातील नाईक नगर तांडा येथील पवन गोपीचंद चव्हाण या 32 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने मुख्यमंत्र्यांना उद्देशून चिठ्ठी लिहिली आहे. बंजारा समाजाचा हैदराबाद गॅजेटच्या तरतुदीनुसार एसटी प्रवर्ग म्हणजेच अनुसूचित जमातीमध्ये समावेश करा, अशी मागणी या चिठ्ठीतून पवन चव्हाण यांनी केली आहे.
पवनच्या आत्महत्येची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले.यावेळी मयत पवनच्या खिशात एक चिट्टी सापडली. त्यात त्यांने हैदराबाद गॅझेटप्रमाणे बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळवून देण्यात यावे अशा मागणीचे पत्र लिहिलेले आढळले.पवन चव्हाण हे बंजारा समाजाच्या वेगवेगळ्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचे. गेल्या आठ दिवसांमध्ये बंजारा समाजाच्या झालेल्या आंदोलनामध्ये पवन चव्हाण अग्रेसर असायचे. मात्र आरक्षणाच्या मागणीसाठी आता त्यांनी थेट मृत्यूला कवटाळले.

लातूर येथील शाहू कॉलेजमध्ये पवन याने पदवीचे शिक्षण घेतल्याचे सांगण्यात येत आहे.त्यांच्या पश्चात आई-वडील,भाऊ,बायको, एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे. पवन चव्हाण यांनी आत्महत्या केली आहे असे समजतात बंजारा समाजातील विविध लोकांनी घटनास्थळी भेट देत कुटुंबाचे सांत्वन केले. या प्रकरणाचा तपास मुरूम पोलीस करत आहेत.
