चाकण MIDC हादरलं! खड्डे-कोंडीला कंटाळून 20 कंपन्या गाशा गुंडाळणार; 1,000 कोटींची उलाढाल धोक्यात, 4 हजार कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर

पुणे : पुण्याच्या औद्योगिक नकाशावर महत्त्वाचे स्थान असलेल्या चाकण एमआयडीसीसमोर आता पायाभूत सुविधांच्या अभावामुळे मोठं संकट उभं राहिलं आहे. रस्त्यांवरील जीवघेणे खड्डे, दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी आणि त्यातून होणारे अपघात यामुळे चाकणमधील तब्बल 20 लघुउद्योगांनी आपला व्यवसाय इतरत्र हलवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. हे उद्योग सातारा जिल्ह्यातील खंडाळा एमआयडीसीमध्ये स्थलांतरित होण्याच्या तयारीत असून, त्यासाठी संबंधित कंपन्यांनी एकत्र येत संघटनाही स्थापन केली आहे.
चाकण एमआयडीसीला मर्सिडीज-बेंझ, फोक्सवॅगन, स्कोडा आणि ह्युंदाईसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमुळे मोठी ओळख मिळाली आहे. मात्र, औद्योगिक वसाहतीच्या वाढत्या विस्ताराच्या तुलनेत रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेत अपेक्षित सुधारणा झाल्या नसल्याची तक्रार सातत्याने होत आहे. पावसामुळे रस्त्यांची अवस्था आणखी खराब झाली असून, खड्ड्यांमुळे वाहनांची कोंडी वाढत असल्याचे अलीकडील वृत्तांतही समोर आले आहे.

या परिस्थितीचा थेट परिणाम उद्योगांच्या दैनंदिन कामकाजावर होत आहे. चाकणमधून 20 कंपन्या बाहेर पडल्यास सुमारे 1,000 कोटी रुपयांच्या व्यावसायिक उलाढालीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याहून गंभीर बाब म्हणजे या उद्योगांमध्ये काम करणाऱ्या जवळपास 4 हजार कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर संकट येऊ शकते. त्यामुळे हजारो कामगारांच्या कुटुंबांसमोर भविष्यातील आर्थिक स्थैर्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.


दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे कामगारांना घरातून कंपनीपर्यंत पोहोचण्यासाठी मोठा वेळ खर्च करावा लागत आहे. काही कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ये-जा करताना दीड तासापेक्षा जास्त वेळ रस्त्यावर जातो. त्यामुळे कामाचा वेळ, कौटुंबिक जीवन आणि दैनंदिन खर्च या तिन्ही गोष्टींवर परिणाम होत आहे. कंपनी स्थलांतरित झाल्यास नोकरी जाण्याची भीती कामगारांमध्ये आहे. नोकरी गेली तर मुलांच्या शिक्षणाचा खर्च, घरखर्च आणि कर्जाचे हप्ते कसे फेडायचे, असा सवालही कामगारांकडून उपस्थित केला जात आहे.
उद्योगांच्या स्थलांतराच्या चर्चेमुळे चाकण एमआयडीसीच्या पायाभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रस्त्यांची दुरवस्था आणि वाहतूक कोंडीमुळे उद्योगांना वेळेवर मालवाहतूक करणे तसेच कर्मचाऱ्यांची ये-जा व्यवस्थापित करणे कठीण होत असल्याची भूमिका उद्योग क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनीही चाकण एमआयडीसीच्या परिस्थितीवरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. चाकण परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य असून वाहतूक कोंडी हा गंभीर प्रश्न बनल्याचे त्यांनी म्हटले. रस्त्यांसाठी 59 कोटी रुपयांचे निविदा काम निघूनही प्रत्यक्षात खड्डे बुजवले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. या खड्ड्यांमुळे 19 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा करत त्यांनी या परिस्थितीला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला.
विशेष म्हणजे, चाकणमधील रस्त्यांच्या प्रश्नावर प्रशासनानेही आता हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी चाकण परिसरातील विविध विभागांच्या अखत्यारितील रस्ते 25 ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करण्याचे निर्देश दिल्याचे वृत्त आहे. धोकादायक ठिकाणी सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यासोबतच रस्त्यांची दुरुस्ती आणि अतिक्रमण हटवण्याबाबतही संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत.
मात्र, उद्योग स्थलांतराच्या हालचाली सुरू झाल्याने आता प्रशासनाच्या उपाययोजना कितपत प्रभावी ठरतात, हा मोठा प्रश्न आहे. चाकणसारख्या महत्त्वाच्या औद्योगिक पट्ट्यातून कंपन्या बाहेर गेल्यास त्याचा फटका केवळ उद्योगांना नव्हे, तर कामगार, स्थानिक व्यवसाय आणि संपूर्ण परिसराच्या अर्थचक्राला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासन चाकण एमआयडीसीतील रस्ते, वाहतूक आणि पायाभूत सुविधांचा प्रश्न किती वेगाने सोडवतात, याकडे उद्योजक आणि हजारो कामगारांचे लक्ष लागले आहे.