बस्ती जिल्ह्यात अनोखा विवाह; एका तरुणीने जुळ्या भावांशी केलं लग्न, कायदेशीरतेवर प्रश्नचिन्ह

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि तितकाच विचित्र असा विवाहप्रसंग समोर आला आहे. एका तरुणीने सख्ख्या जुळ्या भावांशी एकाच वेळी लग्न केल्याची घटना सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये याच्या कायदेशीर आणि सामाजिक वैधतेबाबत चर्चा रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही नवरदेव लहानपणापासूनच एकत्र वाढलेले असून त्यांनी आयुष्यातील प्रत्येक गोष्ट एकत्र करण्याचा हट्ट धरला होता. “आम्ही वेगळं नाही राहणार,” ही त्यांची जिद्द एवढी टोकाला गेली की त्यांनी लग्नसुद्धा एकाच मुलीशी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला घरच्यांनी विरोध केला, पण अखेरीस मुलांच्या हट्टापुढे त्यांनी माघार घेतली आणि हा अनोखा विवाह पार पडला.
व्हायरल व्हिडिओमध्ये जयमालेच्या वेळी दोन्ही भाऊ नवरीच्या गळ्यात माळ घालताना दिसतात. मात्र, या सगळ्या सोहळ्यात नवरीच्या चेहऱ्यावर आनंदापेक्षा अस्वस्थता आणि नाराजी स्पष्ट जाणवते. हिच बाब अनेकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. “नवरीची संमती होती का?” की तिच्यावर दबाव टाकून हे लग्न लावलं गेलं, असा सवाल लोक करत आहेत.

कायदेशीर बाजू पाहिली तर भारतात एकाच वेळी दोन पती किंवा दोन पत्नी असणं बेकायदेशीर मानलं जातं. त्यामुळे या विवाहाची नोंदणी होणं कठीण आहे. भविष्यात या तिघांनाही कायदेशीर अडचणींना सामोरं जावं लागू शकतं, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पण आता पुढं काय होणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.” सध्या तरी हा विवाह सोशल मीडियावर चर्चेचा आणि वादाचा विषय ठरला आहे.
