‘प्रहार’चे बच्चू कडू आता शिंदेंचे साथीदार; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती..

मुंबई : प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी अखेर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्या समर्थकांसह आज त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला.

विशेष म्हणजे बच्चू कडू हे पूर्वी शिवसेनेतच होते. त्यानंतर त्यांनी वेगळी वाट निवडत प्रहार सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षाच्या माध्यमातून कार्य सुरू ठेवले होते. आता पुन्हा शिवसेनेत प्रवेश करत त्यांची राजकीय “घरवापसी” झाल्याचे बोलले जात आहे.
पक्षप्रवेशानंतर बोलताना बच्चू कडू यांनी स्पष्ट केले की, हा प्रवेश केवळ आमदारकीसाठी नाही, तर शेतकरी, कामगार आणि दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी आहे. ही लढाई पदासाठी नसून जनतेच्या मुद्द्यांसाठी आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, राज्यात विविध ठिकाणी शेतकरी आणि कामगारांसाठी शिवसेना अधिक बळकट करण्याचा त्यांचा निर्धार आहे. “आमचा झेंडा बदलला असला तरी आमचा अजेंडा बदललेला नाही, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

दरम्यान, बच्चू कडू यांचा प्रहार हा राजकीय पक्ष आता अधिकृतपणे शिवसेना शिंदे गटात विलीन होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्यांची प्रहार सामाजिक संघटना पूर्वीप्रमाणेच स्वतंत्रपणे कार्यरत राहणार असून जनहिताची कामे सुरू ठेवणार आहे. या घडामोडीमुळे राज्याच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.