या एका चुकीचा मोठा फटका! लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांची नावे गायब; तुमचे नाव यादीत आहे का?

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. योजनेसाठी ई-केवायसी पूर्ण करण्याची मुदत संपल्यानंतर सुमारे 80 लाख महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, लाभार्थी महिलांना अनेक वेळा ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले होते. अर्ज करताना महिलांनी दिलेली माहिती तात्पुरती ग्राह्य धरण्यात आली होती. मात्र त्यानंतर संबंधित कागदपत्रांच्या पडताळणीसाठी ई-केवायसी करणे आवश्यक होते. यासाठी सुमारे नऊ महिने सातत्याने पाठपुरावा करण्यात आला, तरीही मोठ्या संख्येने महिलांनी प्रक्रिया पूर्ण केली नाही.
फडणवीस यांच्या मते, ज्या महिलांना अर्ज करता येतो आणि स्वघोषणापत्र (Self Certification) देता येते, त्यांना ई-केवायसी करणे शक्य नव्हते असे मानणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे ज्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही, त्या अनेक महिला योजनेच्या पात्रतेचे निकष पूर्ण करत नसाव्यात, असा निष्कर्ष प्रशासनाने काढला आहे.

राज्यातील सुमारे 1 कोटी 70 लाख महिला योजनेच्या निकषांमध्ये बसत असून त्यांना यापुढेही नियमितपणे लाभ मिळत राहणार आहे. मात्र ज्या महिलांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांना सध्या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

तथापि, पात्र असूनही काही कारणांमुळे ई-केवायसी न करू शकलेल्या महिलांसाठी भविष्यात पुन्हा एकदा ई-केवायसीची विंडो सुरू करण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करू शकते, असे संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे पात्र महिलांना आणखी एक संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.