हवेली तालुक्याच्या ग्रामीण भागाचे अनेक दशकांचे स्वप्न पूर्ण ! माऊली कटकेंच्या आमदारकीने तालुक्यात समाधानाचे भाव ….!!

जयदिप जाधव
उरुळीकांचन : शिरुर -हवेली विधानसभा मतदारसंघात विक्रमी मताधिक्याने विजयी झालेल्या महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटकेयांच्या विजयाने हवेली तालुक्याच्या ग्रामीण भागाचे तब्बल पाच दशकांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. हवेली तालुक्याचा ग्रामीण भाग हा जिल्ह्या्च्या अनेक विधानसभा मतदारसंघाला जोडला जाऊन तालुक्याची वारंवार संधीला हुलकावणी मिळत होती. परंतु तब्बल पाच दशकांनी तालुक्याच्या ग्रामीण भागाला नेतृत्वाची संधी मिळाल्याने हवेलीकरांत या आमदारकीच्या संधीने मोठे समाधान व्यक्त होत आहे.
हवेली तालुक्याचा संपूर्ण भाग हा पुणे शहराला चारही बाजूंनी वेढला असल्याने तालुक्याच्या ग्रामीण भागाला नेतृत्वाच्या संधीला पाच दशके हुलकावणी मिळाली आहे. तालुक्याचे भाग्य -विधाते व सहकारमहर्षी स्व.आण्णासाहेब मगर यांच्या पश्चात तालुक्याला एकसंध ठेवणारे नेतृत्व मिळाले नसल्याची पोकळी त्यांच्या पश्चात तालुक्याने पाहिली आहे. ग्रामीण भागातील कृषी व सहकार क्षेत्राला पुढे नेईल असे नेतृत्व तालुक्याला अनेक वर्षे मिळाले नसल्याने नेतृत्वाची उणीव जाणवून तालुका कुरघोडीच्या राजकारणात विखुरला गेला आहे. तालुक्याची झेप जिल्ह्याच्या राजकारणाबाहेर जात नसल्याने तालुक्याला उसण्या नेतृत्वावर विसंबून राहण्याची परिस्थिती उद्भवत होती. अनेक दशके गेली परंतू या तालुक्याच्या भागाने जिल्ह्याच्या नेत्यांच्या पाठिमागे फक्त फरफट जाण्याचे इतकेच काय ते काम केल्याची वस्तुस्थिती आहे.
तालुक्यात नेतृत्व नसल्याने तालुका नेतृत्व स्विकारण्याची मानसिकता दाखवत नसल्याचे तालुक्यातील नेतेमंडळींच्या या सवयीचा फटका तालुक्यातील सहकारी संस्था ओरबडणे, पक्षीय राजकारणात स्वतंत्र व्यवस्था करणेअशाकार्यपद्धतीत कामकरून तालुक्याचे हित जोपासण्यापेक्षा स्वहीत जोपासण्याचे कार्य करत होता. त्यामुळे नेतृत्व हे अनेक दशके जिल्ह्याबाहेर पोहचू शकले नाही ही वस्तुस्थिती आहे.
या कुरघोडीने तालुक्याच्या विकासासह अनेक वर्षे उजाड झालेल्या सहकारी साखर कारखान्याचा प्रश्न तालुक्याला सोडविता आला नाही. नेतृत्व नसल्याने या भागाची भावना ही धाकहतेने जिल्ह्याच्या नेत्यांचे मन वळविण्यात कमी पडल्याची शोकांतिका तालुक्याने भोगली आहे. परंतु आता अनेक दशकांचे तालुक्याचे स्वप्न आमदारकी माध्यमातून माऊली कटकेंचा रुपांने तालुक्याला पहायला मिळाल्याने तालुक्याला विविध सुधारणांसह आरोग्य , शेती व पायाभूत सुविधांवर तालुक्याचा आवाज बुलंद करणारा लोकप्रितीनीधी मिळाला असून कटकेंच्या कामगिरीकडे तालुक्याच्या अपेक्षा असणार आहेत.