पुण्यातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे विश्वस्तांची वारकऱ्यांशी गैरवर्तणूक, व्हिडीओ आला समोर..

पुणे : राज्यभरातून आलेले वारकरी पुण्यातून वारीसोबत पंढरपुरकडे रवाना झाले आहेत. सर्वत्र उत्साहाचे, चैतन्याचे वातावरण दिसून येत आहे, अशातच पुण्यात विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आळंदी देवस्थान संस्थेचे विश्वस्त योगी श्री निरंजन नाथ यांच्या वर्तणुकीमुळे वाद निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.
आळंदी देवस्थान संस्थेचे विश्वस्त योगी श्री निरंजन नाथ यांच्यावर वारकरी, पत्रकार आणि पोलिसांशी अरेरावी आणि उद्धट वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
श्री निरंजन नाथ यांनी वारकरी, विविध माध्यमांचे प्रतिनिधी आणि पोलिस यांच्याशी अरेरावी आणि उद्धट वर्तन केल्याचा आरोप केला जात आहे. संतांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याची माहिती आहे. त्यामुळे मंदिर परिसरात असलेल्या वारकऱ्यांमध्ये आणि भाविकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, निरंजन नाथ यांनी मंदिरात उपस्थित असलेल्या वारकऱ्यांशी उर्मट आणि अवमानकारक बोलणी केली. काही माध्यम प्रतिनिधींना देखील त्यांनी झिडकारल्याची माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हे, तर पोलीस कर्मचाऱ्यांशीही त्यांनी उद्धट संवाद साधल्याचे बोलले जात आहे. यावेळी मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी होती.
घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सामाजिक माध्यमांवर याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. वारकऱ्यांनी या प्रकाराला “धर्माचा आणि सेवाभावाचा अपमान” असे संबोधून निषेध केला आहे.