धाराशिवमध्ये महागाईच्या विरोधात ठाकरे सेनेच्या वतीने बोंबा ठोकून भाजपा सरकारचा निषेध…!

उस्मानाबाद-धाराशिव : स्वयंपाकाच्या गॅससह जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत झालेली भरमसाठ वाढ आणि शेतीमालाच्या किमतीची घसरण होत असल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महागाईची होळी पेटवून केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारचा निषेध करण्यात आला. दोन्ही सरकारच्या निषेधार्थ बोंब ठोकून शिमगा करण्यात आला. पन्नास खोके ! एकदम ओके !! अशा घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता.

यावेळी बोलताना आमदार कैलास पाटील म्हणाले की, वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्किल झाले असताना शेतकर्यांचीही सरकारकडून लूट होत आहे. कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्यामुळे शेतीमाल रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कांद्याला हमीभाव देण्यात यावा. त्याचबरोबर नाफेडमार्फत हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन होऊ दे असे साकडे आ.पाटील यांनी तुळजाभवानी चरणी घातले.
या आंदोलनात कार्यकर्त्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून सरकारच्या नावाने बोंब ठोकून शिमगा केला. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
