गटारीसाठी गेले अन् नदीत वाहून गेले , ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील घटना …

Thane : ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे शनिवारी मोठी दुर्घटना घडली. तानसा नदीत कारसह पाच जण वाहून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यापैकी तीन जणांनी कारमधून उड्या मारल्या. कारमध्ये दोन जण अडकले होते. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून एकजण बेपत्ता असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
ही घटना तानसा धरण येथे घडली जेथे पाच लोक गटारी पार्टी करण्यासाठी कारमध्ये आले होते. तानसा धरणाच्या गेट क्रमांक एकच्या खाली ते कारमध्ये पार्टी करत असताना अचानक तानसा धरणाचे २४ स्वयंचलित दरवाजे उघडले आणि मोठ्या प्रमाणात पाणी नदीत आले. त्यामुळे तानसा नदीत कारसह पाचही जण वाहून गेले.
कारमधून उडी मारून तिघांनी कसा तरी बचाव केला आणि तेथून पळ काढला. कारमध्ये दोन जण अडकले होते. त्यापैकी एकाचा मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला आहे, तर एक जण अद्याप बेपत्ता आहे. गणपत चिमाजी शेलाकांडे असे मृताचे नाव असून तो कल्याण जिल्ह्यातील रहिवासी होता.