पहाटेच्या शपथविधीची कथा मुख्यमंत्र्यांच्या कानी ! उपमुख्यमंत्र्यांनी सुरस कथा सांगितल्या आहेत…!

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनात विविध मुद्द चर्चिले जात असताना, सत्ताधारी व विरोधकांत जोरदार फटकेबाजी चालू आहे. अजित पवारांंच्या आक्षेपांवर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधकांना जोरदार कोपरखळ्या लगावल्या आहेत. शिंदे यांनी अजित पवार पहाटेच्या शपथविधीच्या कथा माहिती असल्याचे सांगून सभागृहात जोरदार बॅटींग केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी विरोधकांसाठी देशद्रोही असा शब्द वापरल्यावरुन मोठा गदारोळ माजला होता. त्यांच्याविरोधात हक्कभंगही आणला होता. त्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “देशद्रोहाची मी सुरुवात केली नव्हती. पण अजित पवार मला तुमच्याकडून अशी अपेक्षा नाही. ज्यांनी मुंबईत बॉम्ब स्फोट केला, त्यांच्यासोबत नवाब मलिकांनी व्यवहार केला. त्या नवाब मलिकांना तुम्ही मंत्रिमंडळात ठेवलं. आणि तुम्ही आम्हाला म्हणाला महाराष्ट्र द्रोही. तुम्ही म्हणता की हे घटनाबाह्य सरकार आहे, मग तुम्ही देखील घटनाबाह्य विरोधीपक्षनेता आहात काय असा समाचार घेतला आहे.
तत्पूर्वी शिंदे- फडणवीस सरकारने जाहिरातींवर मोठ्या प्रमाणावर खर्च केला असल्याचा आरोपही विरोधकांकडून करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अजित पवार सध्या शिवसेनेचे प्रवक्ते असल्यासारखे बोलतात. दादा आपली मैत्री आहे.पण तुम्ही कडवट शिवसैनिक बनू नका. दादा अडीच वर्षे वर्षावर कुणी जात नव्हते. फेसबुक लाईव्हवर सर्व सुरू होतं. 6 कोटी पर्सनल पीआर करायला खर्च केल्यात. आम्ही सामनासकट सर्वांना जाहिराती दिल्यात. घटनाबाह्य सरकार आहे पण जाहिराती चालतात. 70 हजार कोटी इरिगेशनवर खर्च केले पण एकही सिंचन झाले नाही. तुम्ही विरोधी पक्षनेते आहात, जबाबदार आहात. लोकशाहीत आम्ही कुठलंही चुकीचं काम केलेलं नाही.

‘तुम्ही २०१९ मध्ये साखर झोपेत शपथ घेतली. मी तेव्हा सकाळी टीव्ही लावला तेव्हा धक्का बसला. तो खरा आमच्यासाठी मोठा शॉक होता त्यातील अनेक कथा देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितल्या आहेत,’ असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना लगावला.