रेशनकार्ड धारकांसाठी कामाची बातमी!! ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करा ‘हे’ काम, अन्यथा भोगावे लागतील परिणाम, वाचा सविस्तर…

पुणे : रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची समोर आली आहे. रेशन कार्डाला केवायसी जोडण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे.
तसेच अनेक शिधापत्रिकाधारकांना केवायसी पूर्ण करण्यात येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन, सरकारने ही मुदत ३० एप्रिल २०२५ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ही अंतिम संधी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. मागील काही महिन्यांपासून राज्यभरात रेशन कार्डधारकांसाठी केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे.
दरम्यान, यासाठी यापूर्वी अनेकदा मुदतवाढ देण्यात आली होती. विभागीय अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही मुदतवाढीची चौथी वेळ आहे आणि यानंतर कोणतीही अतिरिक्त मुदत मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे, सर्व रेशन कार्डधारकांनी ३० एप्रिल २०२५ पर्यंत आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे.
तसेच या अंतिम मुदतीनंतर ज्या कार्डधारकांची केवायसी प्रक्रिया अपूर्ण असेल, त्यांना मिळणारे मोफत किंवा अनुदानित धान्य बंद केले जाईल, तसेच त्यांचे रेशन कार्ड रद्द होण्याचीही शक्यता आहे. सध्या राज्यात ५ लाखांहून अधिक रेशन कार्डधारकांची केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. अनेक भागांमध्ये हीच परिस्थिती असल्याने शेवटची संधी म्हणून ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
रेशन कार्ड केवायसी पूर्ण करण्यासाठी सरकारने ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. नागरिक आपल्या सोयीनुसार कोणत्याही पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात.