निराधारांच्या उत्पन्न मर्यादेत वाढ करणार, मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती…
मुंबई : विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यात संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत निराधार पुरुष, महिला, अनाथ मुले, दिव्यांग, विधवा आदींना अनुदान देण्यात येते.
त्यासाठी दारिद्रय रेषेखालील कुटुंबांच्या यादीत नाव अथवा २१ हजार रुपये वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. यामुळे याबाबत अनेकदा मागणी केली जात होती. या उत्पन्नाच्या मर्यादेत ५० हजार रुपयापर्यंत वाढ करण्यास शासन गंभीर असून याबाबत तपासून निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले.
हसन मुश्रीफ म्हणाले, संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थींचे मूल २५ वर्षाचे झाल्यानंतर बंद होणा-या निवृत्तीवेतनाचा निर्णय बदलला आहे. मुलाला नोकरी लागत नाही, तोपर्यंत निवृत्ती वेतन सुरू राहणार आहे.
त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत घरोघरी जाऊन लाभार्थींच्या बोटाचा अंगठा घेऊन पैसे देण्याची व्यवस्था सुरू करण्याबाबत तपासून निर्णय घेण्यात येणार आहे.
त्यासाठी पोस्टल बँकेच्या पर्यायाचीही चाचपणी करण्यात येईल. याबाबत काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यावर मंत्र्यांनी उत्तर दिले आहे.