एसटी प्रवाशांसाठी मोठा दिलासा! स्मार्ट कार्डची सक्ती पुढे ढकलली; ‘या’ तारखेपर्यंत मिळाली मुदत..

मुंबई : राज्यातील एसटी प्रवाशांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवासी सवलतींचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या एनसीएमसी स्मार्ट कार्डची सक्ती तात्पुरती पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि इतर पात्र प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यापूर्वी 1 ऑगस्टपासून स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, अनेक पात्र प्रवाशांनी अर्ज आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करूनही त्यांना अद्याप कार्ड मिळालेले नसल्याने सवलतींपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती.

ही बाब लक्षात घेऊन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्मार्ट कार्डच्या सक्तीला 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे या कालावधीतही पात्र प्रवाशांना पूर्वीप्रमाणे प्रवासी सवलतींचा लाभ मिळणार आहे.


राज्य सरकारच्या अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांना एसटीमधून मोफत प्रवासाची सुविधा दिली जाते. तसेच महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के भाडे सवलत मिळते. या सवलती अधिक पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने देण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले की, केवळ तांत्रिक अडचणींमुळे कोणत्याही पात्र प्रवाशाला सवलतींपासून वंचित ठेवले जाणार नाही. त्यामुळे 1 सप्टेंबरपर्यंत स्मार्ट कार्डची सक्ती लागू होणार नाही.
दरम्यान, एसटी महामंडळाने सर्व पात्र नागरिकांना वाढीव मुदतीचा लाभ घेत लवकरात लवकर एनसीएमसी स्मार्ट कार्डची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून 1 सप्टेंबरनंतर सवलतींचा लाभ घेताना कोणतीही अडचण येणार नाही.