अमित शाहांची मोठी घोषणा! २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; २०२९ पर्यंतचा प्लॅन सांगितला

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देशात एक महिना सेवा संकल्प अभियान राबवले जाणार आहे. या काळात देशभरात विकासाची कामे केली जाणार आहेत. सोबतच एनडीए सरकारने आतापर्यंत केलेल्या कामांची माहितीही जनतेला दिली जाणार आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह आज (१३ सप्टेंबर) मुंबईच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली.
याच पत्रकार परिषदेत त्यांनी या अभियानाची घोषणा केली. दरम्यान, एकीकडे सेवा संकल्प अभियानाची घोषणा करून शाह यांनी समान नागरी कायद्याविषयी महत्त्वाची माहिती दिली. आम्ही २०२९ सालापर्यंत समान नागरी कायदा लागू करू असं शाह म्हणाले.

भारतात सेवा संकल्प अभियान राबवले जाणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात आता सेवा संकल्प अभियान राबवले जाणार आहे. या अभियानाअंतर्गत एकूण १२ कलमी कार्यक्रम राबवला जाणार आहे. रक्तदान, आभार, नमो सेवा, संगीत नाट्यमय प्रस्तुती, अंगणवाडी सेवा, सेवा ज्योती कलश यात्रा, वाडनगर ते वाराणसी यात्रा, वाराणसे ते वाडनगर यात्रा, सेवा सेतू अभियान, ब्लॉक आणि तालुका स्तरावर सर्व सरकारी योजना पोहचवण्याचे अभियान अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.


समान नागरी कायद्याविषयी नेमकी काय माहिती?
अमित शाहांनी यावेळी समान नागरी कायदा म्हणजेच यूसीसीवर महत्त्वाचं भाष्य केलं. एनडीए शासित २१ राज्यात समान नागरी कायदा लवकरच लागू होईल. २०२९ सालापर्यंत याबाबत निर्णय घेतला जाईल, असे यावेळी शाह यांनी सांगितले. अमित शाह यांनी मोदी यांनी सत्तेत आल्यापासून कोणकोणती कामे केली, याचीही सविस्तर माहिती दिली. त्यांनी कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाचा उल्लेख केला. अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीबातही शाह यावेळी बोलले.
मोदी यांच्या सत्ताकाळात चांद्रयान-3 राबवले गेले, याची आठवण शाह यांनी काढली. तसेच रेल्वेचे आधुनिकारण करण्यात आले. रेल्वेला विकासाच्या बाबतीत खूप पुढे नेऊन ठेवलं, असंही शाह यावेळी म्हणाले. त्यांनी देशातील एकएक घुसखोराला बाहेर काढू, असे आश्वासन शाह यांनी पुन्हा एकदा दिले.