लाडक्या बहिणींना मोठा धक्का! ‘या’ महिलांचे पैसे बंद होणार; तुमचं नाव यादीत आहे का?

मुंबई : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील तब्बल 2 हजार महिलांनी या योजनेचा लाभ नाकारला असून, त्यामागे सरकारचा ‘एकावेळी एकच योजनेचा लाभ’ हा नियम कारणीभूत असल्याचे समोर आले आहे.
अडीच लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत दरमहा 1,500 रुपये लाभार्थींच्या खात्यात जमा केले जातात. विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेल्या या योजनेत सत्तेत आल्यानंतर 2,100 रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. मात्र, अद्याप या सन्मान निधीत कोणतीही वाढ झालेली नाही.

गेल्या काही महिन्यांपासून केवायसी प्रक्रियेनंतर अनेक महिलांची नावे योजनेतून वगळण्यात आल्यानेही ही योजना चर्चेत आहे. त्यातच सरकारने एकाच वेळी दोन शासकीय योजनांचा लाभ घेता येणार नाही, हे स्पष्ट केल्यामुळे अनेक महिलांसमोर निवडीचा प्रश्न निर्माण झाला आहे.


याच पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील सुमारे 2 हजार महिलांनी आम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असल्याने लाडकी बहीण योजनेचा लाभ नको, असे लेखी अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे सादर केले आहेत.
सरकारच्या नियमानुसार, संजय गांधी निराधार योजना किंवा इतर तत्सम शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे अनेक महिलांनी स्वतःहून लाडकी बहीण योजनेतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.