राज्यात आणखी चार दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा, १५ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट..

पुणे : राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून अवकाळी पावसाचे ढग आहेत. बहुतांश ठिकाणी सोसाट्याचा वारा,गारपीट आणि मध्यम सरींच्या पावसाने हजेरी लावला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी झालेल्या पावसामुळे राज्यातील कमाल तापमानाचा पारा चांगलाच खाली आला आहे.
कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सध्या पावसाचे ढग आहेत. महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा अजूनही कायम असून, हवामान विभागाने पुढील चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. १० मे रोजी खालील जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. सातारा, पुणे, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, अहिल्यानगर, यवतमाळ, गोंदिया आणि गडचिरोली.
दरम्यान, ११ आणि १२ मे रोजी संपूर्ण विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता असून, नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्येही १२ मेला यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यात अनेक भागांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः गारपिटीमुळे भाजीपाला, फळबागा आणि रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.