एल निनोचे सावट आणि अवकाळी पावसाचा फटका; महाराष्ट्रात हवामानाचा इशारा, सरकारकडून सूचना…

मुंबई : राज्याच्या हवामानात मोठा बदल जाणवत असून यंदा एल निनो या नैसर्गिक घटनेच्या प्रभावामुळे पावसाळ्यात खंड पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पाणी बचतीबाबत महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत.

जूनमध्ये सुरुवातीला पाऊस झाल्यानंतर ऑगस्टपर्यंत पावसाचा खंड राहण्याची शक्यता असल्याने पाणी व्यवस्थापनासाठी आतापासूनच उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
या परिस्थितीचा शेती, उद्योग आणि बांधकाम क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंपदा विभागाने पावले उचलली आहेत.

राज्यातील सर्व महानगरपालिकांना ३१ ऑगस्टपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गरज भासल्यास आगामी काळात पाणी कपात लागू होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.

दरम्यान, राज्यात काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असून जोरदार वाऱ्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
तसेच सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील भिलवडी परिसरात मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे उसाच्या शेतात पाणी साचून आंबा बागांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत.