राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा; गारपीटीचा अंदाज, पुढील दोन दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता..


पुणे : राज्यात मे महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटचे संकट जाण्यास तयार नाही. मागील आठवड्यात राज्यातील अनेक भागांत अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे उन्हाळी पिकांचे नुकसान झाले. आता पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मराठवाड्यात वेगवेगळ्या ठिकाणी पावसादरम्यान वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला. दरम्यान, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांत बुधवारपर्यंत ‘यलो ॲलर्ट’ देण्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार व सिंदखेड राजा तालुक्यांच्या काही भागाला अवकाळी पावसाचा तडाखा बसला.

वादळी पाऊस, गारपिटीने नागरिकांची दैना उडाली. वीज कोसळून तीन गुरे ठार झाली. काही ठिकाणी लग्नसोहळ्यांनाही वादळाचा फटका बसला. वाशीम शहरासह रिसोडमध्ये सोमवारी दुपारी अवकाळी पावसासोबत गारपीट झाली.

दरम्यान, यात उन्हाळी मूग आणि भुईमुगाचे नुकसान झाले. वर्धा जिल्ह्यात सेलू तालुक्यातील मोर्चापूर, गोंदापूर, सूरगाव, कान्हापूर, पवनारला गारपिटीचा फटका बसला. नाशिक जिल्ह्यात मनमाड, तर जळगाव जिल्ह्यात अमळनेर, धरणगाव, चोपडा तालुक्यांत सोमवारी गारपिटीसह पावसाचा तडाखा बसला.

काही भागांत कांद्याचे नुकसान झाले. मनमाड शहर व परिसरात सोमवारी दुपारी गारपीट झाली. वीस ते पंचवीस मिनिटे गारांचा पाऊस झाला. गारपिटीमुळे कांदा पिकाला फटका बसला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!